नवी दिल्ली – नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी संसदेच्या घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना निमंत्रण न देणे हे संवैधानिकदृष्ट्या योग्य नाही. वास्तविक हे उद्घाटन त्यांच्याच हस्ते होणे गरजेचे होते. पण त्यांना तर कार्यक्रमाचेही निमंत्रण दिले गेलेले नाही अशी टीका कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.
आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवीन संसद भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमापासून ते या भवनाच्या उद्घाटनापर्यंतच्या कोणत्याही कार्यक्रमात राष्ट्रपतींना निमंत्रित केले गेले नव्हते. एकूणच संसदीय रचनेत राष्ट्रपतींची भूमिका आणि मान मोठा आहे, पण त्यांना हा मान दिला जात नाही असे ते म्हणाले.
संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवा होता अशी सुचना राहुल गांधी यांनीही केली आहे. त्यावरून आता वेगळाच वाद रंगला असून कॉंग्रेसने हा मुद्दा लाऊन धरला आहे. जुनी काही उदाहरणे देत भाजपकडूनही त्यावर पलटवार केला जात आहे.