हिरोशिमा – संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदेमध्ये जर वास्तवाचे प्रतिबिंब दिसले नाही, तर हे गट म्हणजे केवळ “गप्पांची दुकाने’ ठरतील, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक व्यासपिठांमदील सुधारणांचा आग्रह धरला. “जी-7′ परिषदेमध्ये बोलत असताना पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केले. शांतता आणि स्थैर्यासाठीच जर संयुक्त राष्ट्राची निर्मिती झाली असेल तर अन्य कोणत्याही गटाला या मुद्यावर बोलण्याची गरजच का पडावी, असा प्रस्न देखील त्यांनी उपस्थित केला.
ही विचार करण्याजोगी बाब आहे. संयुक्त राष्ट्र ज्यांची सुरुवातच शांतता स्थापन करण्याच्या कल्पनेने झाली त्यांना आज वादविवाद थांबवण्यात यश का येत नाहीये ? संयुक्त राष्ट्रात दहशतवादाच्या व्याख्येला अजून पर्यंत मान्यता का मिळाली नाही ? आपण आत्मचिंतन केलं तर एक गोष्ट उघड आहे. गेल्या शतकात स्थापन झालेल्या संस्था, 21 व्या शतकातल्या व्यवस्थेशी सुसंगत नाहीत. सद्यस्थितीच्या वास्तवाचं प्रतिबिंब त्या दर्शवत नाहीत. यासाठीच संयुक्त राष्ट्रांसारख्या मोठ्या संघटनांमध्ये वास्तविक स्वरूपात सुधारणा आवश्यक आहेत. त्यांना ग्लोबल साउथची भूमिका मांडावी लागेल. अन्यथा, आपण संघर्ष संपवण्याबाबत केवळ चर्चा करत राहू. संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदा केवळ चर्चांचं एक माध्यम म्हणून ओळखल्या जातील. असे पंतप्रधान म्हणाले.
सर्व देशांकडून संयुक्त राष्ट्रांची सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला जाणं हे आवश्यक आहे. सद्यस्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांच्या विरोधात एकत्रित आवाज उठवणे आवश्यक आहे. कोणताही तणाव, कोणत्याही वादविवादांवर शांततापूर्ण मार्गाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला गेला पाहिजे, या मताचा, भारत नेहमीच राहिला आहे. आणि जर कायदेशीर मार्गाने काही तोडगा निघाला तर तो मान्य केला पाहिजे. आणि याच भावनेतून भारताने बांगलादेश बरोबर आपली भूमी आणि सागरी किनाऱ्याचा सीमा वाद सोडवला होता, याची आठवण देखील पंतप्रधानांनी याप्रसंगी करून दिली.
भारतात आणि इथे जपानमध्ये सुद्धा हजारो वर्षांपासून भगवान बुद्धांच्या विचारांचं पालन केले जात आहे. आधुनिक जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्याचे निराकरण भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणीत मिळू शकलेलं नाही. जग आज ज्या युद्ध, अशांतता आणि अस्थैर्याचा सामना करत आहे त्यावर भगवान बुद्ध यांनी अनेक शतकांपूर्वीच उपाय सांगितला होता, असे सांगून पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा दाखला दिला.
नहि वेरेन् वेरानी, सम्मन तीध उदासन्, अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सन्नतन।
म्हणजे, शत्रुत्वाने शत्रुत्व मिटत नाही तर आपलेपणाने शत्रुत्व संपुष्टात येते. या भावनेतूनच आपल्याला सर्वांच्या सोबत राहूनच पुढे वाटचाल केली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.