नवी दिल्ली – गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातील दरांच्या तुलनेत देशातील विविध जीवनावश्यक वस्तुंचे भाव उतरले आहेत असा दावा केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी केला आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी या भावाची तुलानात्मक यादीच ट्विटरवर टाकली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या वर्षी 2 एप्रिल रोजी पामतेलाचा भाव 150 रूपये होता, तो आता 109 रूपये इतका झाला आहे. ही घसरण 27 टक्क्यांची आहे. कांद्याचा दर गेल्या वर्षी 28 रूपये किलो इतका होता यावर्षी तो 21 रूपये इतका झाला आहे. सुरजमुखी तेलाचा दर 183 रूपये इतका होता, तो आता 148 इतका झाला आहे. मोहरीचे तेल 188 रूपयांवरून 154 रूपये इतके खाली आले आहे.
वनस्पती तेल 155 वरून 130 रूपये इतके घटले आहे.सोयाबिनचे तेल 162 वरून 138 इतके झाले आहे. या खेरीज भाज्या आणि डाळींच्या भावातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 2 एप्रिल 2022 च्या तुलनेत बटाट्याच्या भावात पंधरा टक्के, टॉमेटोच्या भावात 13 टक्के, हरभरा डाळीच्या भावात 5 टक्के आणि मसुर डाळीच्या भावात चार टक्के घट झाली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.