अमृतसर – खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांची शोध मोहीम सुरूच आहे. मात्र, अमृतपाल सिंगच्याविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईतील तब्बल 348 जणांची आज सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 360 जणांना अटक केली होती.
याबाबत अकाल तख्तच्या जत्थेदारांचे स्वीय सचिव जसपाल सिंग यांनी माहिती दिली. तसेच, उर्वरीत लोकांचीही लवकरच सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कट्टर धर्मप्रचारक अमृतपाल सिंगच्याविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पकडलेल्या सर्व शीख युवकांची सुटका करावी, असा निर्वाणीचा इशारा अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी दिला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी पंजाब सरकारला हा इशारा दिला होता.
या कारवाईदरम्यान काही लोकांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याबद्दल त्यांनी पंजाब सरकारचा निषेध केला होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सुमारे 30 टक्के लोक अट्टल गुन्हेगार आहेत, असे जत्थेदारांनी हा इशारा देण्याच्या काही दिवस आधी पंजाब पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर इतरांचीही पडताळणीनंतर सुटका केली जाणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.