मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ‘दीपाली सय्यद’ या आपल्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. अश्यातच आता पुन्हा एकदा दीपाली सय्यद आपल्या एका वक्तव्यामुळे प्रकाश झोतात आल्याचं दिसून येत आहे. राज्य कुस्तीगीर परिषद व कुस्ती महासंघाच्या मान्यतेने पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवार (ता. 23) व शुक्रवार (ता. 24) रोजी होणार आहे. अशी माहिती कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी दिली.
मात्र, आता ही कुस्ती स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कुस्तीचा थरार नेमका कुठे रंगणार यावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. ही स्पर्धा सांगलीतच होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नेत्या दीपाली सय्यद यांनी महिला महाराष्ट्र केसरी कोल्हापुरातच होणार असल्याचा दावा केल आहे. तर, दुसरीकडे बाळासाहेब लांडगे यांनी सांगलीत होत असलेली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अधिकृत असल्याच त्यांच म्हंटलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, याच प्रकरणावर बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, “कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा हीचं शासनाची अधिकृत स्पर्धा असून, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे.. शासनाने महिलांच्या महाराष्ट्र केसरीला परवानगी दिली आहे.
ही स्पर्धा मी मुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही जिल्ह्यात घेऊ शकते. कोल्हापूर कुस्तीची पंढरी असल्याने येथे ही स्पर्धा व्हावी..’ असं दीपाली सय्यद बोलल्या. यावेळी त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दरम्यान, आता दीपाली सय्यद यांनी वेगळी भूमिका मांडल्यामुळे कुस्तीचा थरार नेमका कुठे रंगणार? असा सवाल कुस्तीशौकीनांना पडला आहे.