मुंबई – देशात “एच3एन2′ या इन्फ्लुएंझा व्हायरसचे रूग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातही या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी तसेच मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच समाजिक अंतराचे पालन करावे असे महत्त्वाचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या जनतेला केले आहे. महाराष्ट्रात “एच3एन2′ विषाणूचा फैलाव वाढत आहे मात्र घाबरण्याच काहीही कारण नाही असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात सातत्याने या विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असताना, बुधवारी दोन रुग्ण दगावाल्याचीही माहीती आली होती. जागतिक आरोग्य संघटनेने(डब्लूटीओ) दिलेल्या माहितीनुसार “एच3एन2′ संक्रमित रूग्णांमध्ये खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणे, गळ्यात खरखर आणि नाक वाहणे ही लक्षणे दिसतात. तसेच अनेक रूग्णांमध्ये आलेला ताप पाच ते सात दिवसांत बरा होतो, पण सर्दी-खोकला बरा व्हायला दोन ते तीन आठवडे जातात.