मुंबई- अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प आज जाहीर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून “पंचामृत’ ध्येयावर आधारित अर्थसंकल्प असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले. पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प 13,437 कोटी रुपयांचा आहे. आजच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वच संवर्गातील घटकाला दिलासा मिळाला आहे.
अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार असल्याचेही घोषित करण्यात आले आहे. यामध्ये 22 योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी करणार आहे.
महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अहमदनगर येथे मुख्यालय असणार आहे. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी देण्यात येणार असल्याचीही घोषणा फडणवीस यांनी केली आहे.