मुंबई – शिंदे फडणवीस सरकारने राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच या सरकारने अर्थसंकल्प मांडला. यावेळी सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हे सरकार कोसळण्याच्या भीतीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचा दावा यावेळी राऊत त्यांनी केला.
“शिंदे-फडणवीसांनी सरकार कोसळण्याच्या भीतीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल हे त्यांना माहिती आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात ज्याप्रकारे सुनावणी सुरू आहे त्यावरून आम्हाला सर्वांना खात्री आहे की, घटनेनुसार निर्णय लागेल आणि सुरुवातीचे १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर सरकार कोसळेल, अशी परिस्थिती आहे.” असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
“योजनांची घोषणा झाली आहे, पण सरकारच्या तिजोरीत पैसे कुठे आहेत” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच सरकार कोसळल्यानंतर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात म्हणून काल थापेबाजीचा अर्थसंकल्प सादर झाल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले. तसेच निवडणुका न घेणं हा डरपोकपणा असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हंटले.
सामनातून देखील अर्थसंकल्पावर टीका
“महाराष्ट्राची वास्तविक आर्थिक स्थिती जनतेच्या नजरेसमोर न येऊ देता महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्नाळू दुनियेची सैर घडवणारा हा अर्थसंकल्प आहे. सत्तेसाठी वाटेल तेव्हा, वाटेल तेवढय़ा ‘खोक्यां’चा वापर करायचा आणि शेतकरी व जनतेसाठी मात्र निवडणुकीच्या वर्षात तेवढा घोषणांचा सुकाळ करून जनतेला सुखाची स्वप्ने दाखवायची, असेच हे धोरण आहे. गुरुवारी विधिमंडळात सादर झालेला निवडणूक अर्थसंकल्प तेच सांगतो” अशी टीका सामानातून करण्यात आलिया आहे.