खा. लोखंडे यांनी झेडपी सीईओंसमोर व्यक्त केला संताप
नगर – जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीवाटपात सत्ताधाऱ्यांवरच अन्याय होत आहे. भाजप खासदार-आमदारांना 60 टक्के, तर मुख्यमंत्री शिंदे गटाला 40 टक्के निधी वाटप करण्याचे ठरले असताना शिंदे गटाला डावलण्यात येत आहे. पराभूत आमदाराच्या मतदारसंघात 10 कोटी आणि विद्यमान खासदाराला केवळ तीन कोटी निधी हा कसा निकष? अधिकारी आणि मंत्री मालक झालेत का? असा संप्तत सवाल खा. सदाशिव लोखंडे यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला. या वेळी साईज्योती स्वयंसहायता यात्रेचे निमंत्रण न मिळाल्याबद्दल खा. लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
सोमवारी दुपारी 1 वा. खा. लोखंडे जिल्हा परिषदेत आले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेतली. त्या वेळी खा. लोखंडे यांनी वार्षिक नियोजन निधीवाटपासह साईज्योती यात्रा व जलजीवन मिशनमध्ये उभारण्यात येत असलेल्या पाणीयोजनांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेषतः वार्षिक नियोजन निधीचे वाटप योग्य पद्धतीने झाले नसल्याचा आरोप करून खा. लोखंडे म्हणाले की, सध्या जिल्ह्यात अधिकारी व मंत्री मालक झाले आहेत का? मीदेखील खासदार आहे. परंतु मी कामांची यादी दिली. प्रत्यक्षात मात्र एकाही कामाचा समावेश झालेला नाही. मग हा निधी गेला कोठे अशी विचारणा सीईओंना त्यांनी केली.
मी आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून, उद्या (मंगळवार)पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसणार आहे, असा पवित्राच खा. लोखंडे यांनी घेतला. मी खा. डॉ. सुजय विखे यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यांना कामांची यादी दिली, तरी एकही काम घेतले गेले नाही. कामे होणार नसतील, तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याशिवाय पर्याय नाही. खासदारांना डावलले जात आहे, हे योग्य नाही. साईज्योती यात्रेचे निमंत्रण नाही. जाहिरातींवर खासदारांचा उल्लेख नाही. मंत्री व अधिकाऱ्यांचे फोटो लावले. आता काय अधिकारी मते मागणार आहेत का? लोकांसमोर आम्हाला जावे लागते. जलजीवन मिशनच्या कामांमध्ये सर्व मिलिभगत चालू आहे. ज्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले, ते ठेकेदार दुसऱ्यांच्या नावावर कामे करीत आहेत. एक सलग काम असताना त्याचे तुकडे पाडण्यात आले. सर्व कामे विभागून देण्यात आली आहेत. या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी या वेळी खा. लोखंडे यांनी केली. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खा. लोखंडे यांची समजूत काढून त्यांना सर्व कामे घेण्यात येतील, असे स्पष्ट केले.
जुन्या उद्भवांवरच उभारणी..!
जलजीवन मिशन योजनेमध्ये केंद्राचा 50 टक्के निधी आहे. गेली 25 ते 30 वर्ष ते उद्भव आहेत. ते कोरडे पडले, तरी त्या उद्भवावर पाणीयोजना उभारण्यात येत आहेत. हे उद्भव रद्द करून नव्याने उद्भव घेणे आवश्यक आहे. मात्र, या योजनेत जुनेच उद्भव घेऊन योजना पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना शुद्ध व पुरेसे पाणी कसे मिळणार, असा प्रश्न आहे. जुन्या उद्भवांवरील पाणीयोजना रद्द करून नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असे खा. लोखंडे म्हणाले.
निधीवाटपाचे निकष पाळा..
सत्तेमध्ये निधीवाटपाचे निकष ठरले आहेत. भाजप खासदार-आमदारांना 60, तर शिंदे गटाला 40 टक्के निधीवाटप होणे आवश्यक आहे. मात्र, तसे झाले नाही. याबाबत सीईओंबरोबर चर्चा केली. साईज्योती यात्रेबाबत राजशिष्टाचार पाळला गेला पाहिजे. आमदार व खासदारांना जबाबदार अधिकाऱ्यांकडून निमंत्रण दिले गेले पाहिजे होते; पण तसे झाले नाही, असे खा. लोखंडे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.