पुणे – रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक स्थापन केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. वारीशे (वय 48) यांची 6 फेब्रुवारी रोजी हत्या झाली होती. जमीन व्यवहाराचे दलाल पंढरीनाथ आंबेरकर यांनी त्यांच्या गाडीला जाणिवपुर्वक धडक देऊन त्यांना जबर जखमी केले. रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आंबेरकर या परिसरात प्रस्तावित रिफायनरीच्या भूसंपादनास विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला धमकावत असे. आंबेरकर यांच्या कारवायांच्या संबंधात वारिशे याने स्थानिक मराठी वृत्तपत्रांत लेख लिहुन त्याच्या भानगडींवर प्रकाश टाकला होता. त्यामुळे त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली असे सांगितले जात आहे.
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले.. “या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. एका आठवड्यात तिथे पाच-सात असे गुन्हे घडले, असं एका वर्तमानपत्रात वाचण्यात आलं. हे काही चांगलं लक्षण नाही. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेहमी चांगली असते.
पण हल्ली त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ज्यांची आहे, ते कितपत लक्ष देतात यासंबंधिच्या शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत. त्या संबंधिचं वृत्त छापून आलं आहे. आता पत्रकारांची सुद्धा ही अवस्था झाली, तर याचा अर्थ काय, राज्य कोणत्या दिशेने चाललंय हे आता समजून घ्यावं लागेल’. असं शरद पवार म्हणाले.