लंडन : अनेक लोकांना अंधाराची भीती वाटत असल्याने रात्री झोपताना दिवे चालू ठेवण्याची सवय असते पण अशा प्रकारची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.अशा प्रकारचा निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून समोर आला आहे.
ज्यांना असे दिवे चालू ठेवून झोपायची सवय आहे त्यांना हृदयविकाराचा आणि मधुमेहाचा जास्त धोका असतो असे या संशोधनात म्हटले आहे. केवळ दिवे चालू ठेवल्यामुळे हा धोका निर्माण होतो असे नाही तर जी मोबाईल सारखी उपकरणे आपण वापरतो त्यातून जो प्रकाश परिवर्तित होतो त्याचाही शरीरासाठी धोका होऊ शकतो असे या संशोधनात म्ह टले आहे.
या संशोधनसाठी काही लोकांना रात्री दिवे चालू ठेवून निद्रा घेण्यात सांगण्यात आले होते तर उर्वरित लोकांना दिवे बंद करून अंधारात झोपण्यास सांगण्यात आले होते. जेव्हा दोन्ही गटातील लोकांच्या झोपेचे परीक्षण करण्यात आले तेव्हा दिवे चालू ठेवून झोपलेल्या लोकांना शांत झोप मिळाली नाही असे लक्षात आले, या लोकांची पचनसंस्था सुद्धा व्यवस्थित काम करत नाही असे लक्षात आले तसेच मधुमेहाला प्रतिबंध करणारी जी रसायने शरीरात निर्माण होणे आवश्यक असते त्याचे प्रमाणही कमी झाल्याचे लक्षात आले.
या लोकांचे हृदयक्रिया सुद्धा अव्यवस्थित आणि अनियमित असल्याचे आढळून आले. ज्या लोकांनी दिवे बंद करून निद्रा घेतली होती त्यांना यापैकी कोणताच फरक पडला नाही दिवे चालू ठेवून किंवा टीव्ही चालू ठेवून झोपणाऱ्या महिलांमध्ये स्थूलपणा वाढण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे या संशोधनातून समोर आले. अशा प्रकारे दिवे चालू ठेवून झोप घेणाऱ्यांमध्ये मानसिक ताण-तणावही जास्त असू शकतो. अंधाराची भीती वाटते म्हणून जर लोक दिवे चालू ठेवून झोपत असतील तर तज्ञांनी त्यांना लाल बल्ब वापरायचा सल्ला दिला आहे.