– रमेश जाधव
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी देशाचे रोड मॉडेल ठरलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. अर्थात लोकार्पण झाल्यानंतर एसटी महामंडळाने औरंगाबाद ते नागपूर अशी बससेवा सुरू केली. या बस सेवेला डिसेंबर महिन्यात अधिवेशनाच्या काळात एक दिवस चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु त्यानंतर दररोज केवळ 10 ते 12 प्रवासी घेऊन ही बस चालवण्यात येत आहे.
त्यामुळे समृद्धी महामार्ग एसटी साठी पांढरा हत्ती ठरतोय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान औरंगाबाद ते नागपूर मार्गावर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर सेमीस्लीपर बस सुरू करण्यात आली. औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर 14 डिसेंबरपासून ही बस सुरू करण्यात आली. या बसला नागपूर येथे अधिवेशन सुरू असताना 25 डिसेंबर रोजी 23 हजार 522 रुपयांचे उत्पन्न मिळाले.
त्यानंतर 14 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात 3 हजार 215 रुपये इतकेच उत्पन्न मिळाले. सध्या औरंगाबाद ते नागपूर अशी समृद्धी महामार्गावर बस सेवा सुरू आहे. . सध्या औरंगाबाद ते नागपूर समृद्धी महामार्ग सुरू आहे, हेच मार्ग मुंबईपर्यंत पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना या रस्त्याचा मोठा फायदा होईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात येत आहे.
उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक
औरंगाबाद ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्गावर एसटी महामंडळाला 4644 रुपये टोल भरावा लागतो. डिसेंबर महिन्यात एसटीला नागपूर बस चालवून 2 लाख 46 हजार 798 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. या उत्पन्नातून 17 दिवसांसाठी 78 हजार 948 रुपये समृद्धीच्या टोलसाठी भरावे लागले. तर जवळपास 2 लाख रुपये डिझेलवरच एसटीला खर्च करावे लागले. त्यामुळे तोटाच झाला आहे.