मुंबई – महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष एका टोकाच्या वळणावर येऊन पोहचला आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय अशा दोन्हही ठिकाणी सुरु असलेला हा संघर्ष केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशासाठी लक्षवेधी ठरत आहे. न्यायालयातील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी आज निवडणूक आयोगासमोर शिवसेना कोणाची ? आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार याबाबतची सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होत नसल्याचे म्हंटले आहे.
निवडणूक आयोगासमोर आज होणाऱ्या सुनावणीपूर्वी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत राजकीय परिस्थिती बाबत भाष्य केले. शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो,निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने मागचे निर्णय दिले त्यावरून समजले की नेमकं काय होतय असा सूतोवाच राऊत यांनी यावेळी केला.
“शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी निर्माण होत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे तीच शिवसेना आहे.. शिवसेना एकच आहे” असं स्पष्ट मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शिववसेना पक्ष आणि चिन्हाबाबत १० जानेवारी रोजी या आधीची सुनावणी झाली होती. या सुनावणीमध्ये शिंदे गटाच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेत बदल केल्याचा आक्षेप नोंदवला होता. तसेच ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आली आहे. त्याबाबत देखील आयोग काही भाष्य आज करणार का याकडे सर्वांचे लक्ष आगळे आहे.