मुंबईत येणारे लोकांचे लोंढे थांबवा
मद्रास, दि. 11 – महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा मंडळाने आपल्या अहवालात अशी शिफारस केली आहे की, झोपडपट्ट्यांच्या वाढीस आळा घालण्यासाठी, मुंबईत बाहेरून येणारे लोकांचे लोंढे थांबविले पाहिजे. मुंबईत दररोज बाहेरून सुमारे 350 लोक येतात.
औद्योगीकरणामुळे झोपडपट्ट्या अपरिहार्य झाल्या आहेत व हा प्रश्न तत्परतेने हाताळला गेला पाहिजे. एकूण 1349 झोपडपट्ट्या आहेत. त्यापैकी 643 झोपडपट्ट्या खासगी जमिनीवर, 420 झोपडपट्ट्या सरकारी जमिनींवर आणि 213 नगर पालिकांच्या जमिनीवर आहेत. केंद्र सरकार या झोपडपट्ट्यांची सुधारणाही करीत नाही वा त्या उठवीतही नाही.
हुंडा घेतल्यास नोकरीतून बडतर्फी
पाटणा – हुंडा घेणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा व सरकारी नोकरीत असलेल्यांनी हुंडा घेतल्यास त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री मिश्रा यांनी घोषित केले. शिवाय अशा लोकांवर हुंडाबंदी कायद्यान्वये खटलेही भरले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. हुंडा देणाऱ्यास व घेणाऱ्यास 6 महिने कैद व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे.
शेतमजुरांचे किमान वेतन वाढणार?
मुंबई – महाराष्ट्रातील सुमारे 56 लाख शेतमजुरांच्या किमान वेतनाची मर्यादा वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे, असे मजूर खात्याचे राज्यमंत्री पांडे यांनी जाहीर केले.