रणनीतीकार प्रशांत किशोर ऊर्फ पीके यांनी अनेक मातब्बर नेत्यांना राजकीय सल्ले, टिप्स देऊन सत्तास्थानी नेले आहे. उत्तर भारतात प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा बोलबाला आहे. आता दक्षिणेतील देखील काही नेते पीके यांची मदत घेत आहेत. यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी शर्मिला यांनी पीके यांच्याकडून काही टिप्स घेतल्याचे बोलले जात आहे. यानुसार त्या तेलंगणात राजकीय विस्तारासाठी प्रयत्नशील आहेत.
तेलंगणात केसीआर यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसला आव्हान देण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेस हे शक्ती पणाला लावत आहे. त्याचवेळी शेजारील राज्य आंध्र प्रदेशातील सत्तारूढ आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला रेड्डी देखील तेलंगणात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यानुसार नुकतेच शर्मिला रेड्डी यांना तेलंगणा पोलिसांनी नाट्यमयरित्या अटक केली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी क्रेन लावून शर्मिला यांना त्यांच्या मोटारीसह ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून शर्मिला राज्यात पदयात्रा काढत आहेत. यादरम्यान वारंगल जिल्ह्यात त्यांच्या गटावर हल्ला झाला. या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी समर्थकांसह मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी आंदोलकाविरुद्ध कारवाई करताना त्यांना क्रेनने मोटारीसह उचलले. तेलंगणात पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शर्मिला यांनी आतापर्यंत 3500 किलोमीटरची पदयात्रा केली. शर्मिला रेड्डी या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहीण आहे.
राजशेखर यांचा अकाली मृत्यू झाला तेव्हा शर्मिला या पक्षाच्या वारसदार होतील, असे वाटले. कारण त्यावेळी शर्मिला राजकारणात सक्रिय होत्या. वडिलांचा अकाली मृत्यू आणि बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी भाऊ जगनमोहन रेड्डी तुरुंगात गेल्याने शर्मिला यांनी पक्ष सांभाळला. त्यांनी खंबीरपणे पक्षाचे नेतृत्व केले. मात्र जगनमोहन बाहेर आल्यानंतर शर्मिला यांनी पक्षाची जबाबदारी भावाकडे सोपविली.
अर्थात शर्मिला या एका अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना राजकारणांपासून काही दिवस दूर राहावे लागले. 2019 च्या निवडणुकीत जगनमोहन यांच्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली तेव्हा त्या राज्यसभेवर जातील, असे कयास बांधले गेले होते. परंतु असे घडले नाही. दोन्ही भावंडात मतभेदाच्या बातम्याही समोर आल्या. मतभेद असणाऱ्या काही मुद्द्यांत पक्ष विस्ताराचा मुद्दा होता.
शर्मिला यांनी वाएसआर कॉंग्रेसचा विस्तार तेलंगणात देखील व्हावा, अशी इच्छा बाळगली. मात्र जगनमोहन रेड्डी हे पक्षविस्ताराच्या बाजूने नव्हते. मात्र आता स्वबळावर तेलंगणात राजकारण करण्याचा विचार हा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.