श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या सर्वांगीण विकासाची कल्पना त्यांना मूलभूत लोकशाही अधिकारांची हमी आणि त्या अधिकारांचा सन्मान राखला जाईपर्यंत अपुर्णच राहील, असे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
अब्दुल्ला म्हणाले की, मानवी हक्क हे प्रत्येक माणसाच्या प्रतिष्ठेसाठी अपरिहार्य आहेत आणि ते जपलेच गेले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त अब्दुल्ला यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जम्मू काश्मीरचा शिडीसारखा वापर केला जात आहे. त्या आधारे ते सत्तेवर आहेत.
ते म्हणाले की, केंद्रातील विद्यमान सरकारने येथील तरूणांना रोजगार तर दिलाच नाही पण त्यांनी अनेक नोकरदार युवकांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जी काही थोडीफार नोकर भरती झाली आहे तीही भ्रष्टाचाराशिवाय झालेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
आमचे सरकारी कर्मचारी प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. या सरकारने कर्मचाऱ्यांच्या अधिकारावर मोठ्या प्रमाणावर कब्जा करणे ही आपल्या सर्वांसाठी मोठी चिंतेची बाब आहे असे ते म्हणाले.