ऍडलेड – दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ जिंकल्यामुळे भारत व दक्षिण आफ्रिका संघांना आता उरलेल्या लढतींत विजयाचीच गरज निर्माण झाली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने 4 सामने 2 विजय 1 पराभव व एक सामना रद्द झाल्याचे 1 असे 5 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे भारताचे 4 सामने 3 विजय व एक पराभव यांत मिळून 6 गुण बनले आहेत.
पाकिस्तानचे या विजयासह 4 सामने 2 विजय 2 पराभव मिळून 4 गुण झाले आहेत. आता त्यांनी उरलेला एक सामना जिंकला तर त्यांचे 6 गुण होतील. दक्षिण आफ्रिकेने पुढील सामना जिंकला तर त्यांचे 7 गुण होतील व भारताने उरलेला सामना जिंकला तर भारताचे 8 गुण होतील.
मात्र, दक्षिण आफ्रिका व भारत यांनी आपापल्या सामन्यांत पराभव पत्करले तर उपांत्य फेरीत कोणते दोन संघ दाखल होतील याची रंगत निर्माण होणार असून त्यावेळी सर्वात जास्त गुण असलेले दोन संघ पात्र ठरतील. मात्र, भारत व दक्षिण आफ्रिका यांनी सामने जिंकले तर हेच दोन संघ पात्र ठरतील व पाकिस्तानला मायदेशात जाण्यासाठी परतीचे तिकिट मिळेल.
रंगत वाढली…
पुढील सामना भारताने गमावला व पाकिस्तानने पुढील लढत जिंकली तर दोन्ही संघांचे समान गुण होतील मग सरस नेट रनरेटच्या आधारे पात्र संघ निश्चित होईल. सध्या पाकिस्तानची नेट रनरेट भारतापेक्षा सरस आहे. दक्षिण आफ्रिकेने पुढील लढत गमावली तर त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर जावे लागेल व भारत आणि पाकिस्तानचा संघ पात्र ठरेल. मात्र, भारताने सामना गमावला आणि दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानने पुढील सामना जिंकला तर भारताचे आव्हान संपूष्टात येणार आहे. त्यामुळे सध्याचा गुणफलक पाहिला तर भारत व दक्षिण आफ्रिका यांना उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी पुढील सामना जिंकावाच लागणार आहे.