नगर – जिल्ह्यात लम्पी स्किन आजाराने थैमान घातले आहे. आजार आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच पुन्हा वेग घेतला आहे. जनावरांच्या मृत्यूतही वाढ होत आहे. या परिस्थितीत मंगळवारी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह अचानक जिल्हा दौऱ्यावर आले. “पशुसंवर्धनचे वैद्यकिय अधिकारी येतात का,’ “जनावरांवर व्यवस्थित औषधोपचार होतात का,’ “औषधोपचारासाठी पैसे मागितले जातात का,’ अशा शब्दांत त्यांनी पशुपालक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात या घातक आजाराने पुन्हा वेग घेतला आहे. विशेष म्हणजे, पाऊस थांबल्यानंतर लम्पी ग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मृत्यूची संख्याही वाढत चालली आहे. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 50 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 1133 जनावरांचा मृत्यू झाला असून यामध्ये 228 वासरांचा समावेश आहे.
आजाराचा धोका वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आयुक्त सिंह जिल्हा दौऱ्यावर होते. पारनेर, संगमनेरसह अन्य काही तालुक्यांत त्यांनी भेटी दिल्या. आजाराचा आढावा घेतला. जिल्ह्यातील क्वारंटाइन सेंटरचीही माहिती त्यांनी घेतली. पशुपालक शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजार रोखण्यासाठी आणखी काय करता येईल, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्ह्यात आजाराचे हॉटस्पॉट कुठे आहेत, याचीही माहिती घेतली.
पशुपालक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आजाराबाबत त्यांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. तसेच जनावरांवर उपचारासाठी डॉक्टर येतात का, औषधोपचारासाठी पैसे मागितले जातात का, लम्पीबाधित जनावरांवर उपचार होतात का, यांसारखे प्रश्न विचारून माहिती घेतली.