नवी दिल्ली – केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षाच्या काळात ईशान्येकडील बंडखोरीग्रस्त भाग आणि जम्मू-काश्मीर तसेच नक्षल हिंसाचाराने प्रभावित राज्यांमधील सुरक्षा स्थितीत मोठी सुधारणा झाल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा केला आहे. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिनानिमित्त येथील चाणक्यपुरी भागातील राष्ट्रीय पोलीस स्मारकात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ईशान्येकडील, सशस्त्र दलांना दिलेले विशेष अधिकार आम्ही काढून टाकले आहेत आणि त्याऐवजी, तेथील तरुणांना विशेष अधिकार दिले आहेत, परिणामी या भागातील हिंसाचार 70 टक्क्यांनी कमी झाला आहे, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती अशी आहे की जे पूर्वी सुरक्षा जवानांवर दगडफेक करायचे ते आता पंचआणि सरपंच झाले आहेत.
नक्षल प्रभावित राज्यांमधील एकलव्य शाळांमध्ये आज राष्ट्रगीत गायले जाते, तर या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकतो, असेही ते म्हणाले. देशभरातील पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी केलेल्या बलिदानामुळे भारत विकासाच्या मार्गावर जात असल्याचेही अमित शहांनी म्हटले आहे. या जवानांनी कोविडच्या काळातही महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले.