जालना :- भारत देशाला जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अधिक विकसनशील बनवण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील 25 ते 50 वर्षाची दूरदृष्टी ठेऊन विकास कामे करण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जालना येथील रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार असुन जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध राजूर येथील गणपती मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे नवीन रेल्वे स्थानकाचे हे डिझाईन असणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त हे रेल्वे स्थानक राहणार आहे. यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच लातूर येथील रेल्वे कोच निर्मिती कारखान्यातून वंदे भारत रेल्वे बरोबरच कोचच्या निर्मितीमुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.
जालना रेल्वे स्थानकावर कोच देखभाल सुविधांचा विकास (पीटलाईन) च्या कामाचे भूमीपूजन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
#जालना रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार — केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
कोच देखभाल सुविधांच्या विकास (पीट लाईन) कामाचे भूमीपूजन संपन्न@VijayR_IAS@MahaDGIPR@InfoMarathwada pic.twitter.com/8s7O1zUBk8— District Information Office, Jalna (@InfoJalna) October 3, 2022
व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश राठोड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, भास्कर आंबेकर, माजी आमदार विलास खरात, उद्योजक घनश्याम गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना आदींची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, राष्ट्र हिताच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत दूरदर्शीपणे देशातील प्रमुख शहरांमध्ये असलेल्या प्रत्येक सोयी-सुविधा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणांसह दुर्गम भागापर्यंत उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रही आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली रेल्वे विभागाचे आधुनिकीकरण करण्यात येऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आजघडीला रेल्वे स्थानकांच्या दोनही बाजुला शहर वसलेले आहे. पुढील 25 वर्षांतील शहराचे होणारे विस्तारीकरण लक्षात घेता “रुफप्लाझा” या तंत्रज्ञानाचा वापर करुन शहराच्या दोनही बाजुच्या नागरिकांना रेल्वेच्या सुविधा मिळाव्यात यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत देशभरातील 50 रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येत आहे. यामध्ये जालना येथील स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. भविष्यातील शहर विस्तारीकरण लक्षात घेत 200 कोटी रुपये निधी खर्चून सर्व सुविधांनीयुक्त तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने या रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जगभरामध्ये वेगवान रेल्वे म्हणून बुलेट ट्रेनचे नाव समोर येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून भारतीय बनावटीची वेगवान अशी वंदे भारत रेल्वे बनविण्यात भारतीय अभियंत्यांना यश मिळाले आहे. 180 कि.मी. प्रती तास वेगाने धावणारी ही रेल्वे सन 2019 पासून सुरु करण्यात आली असून आतापर्यंत या रेल्वेने 18 लक्ष किलोमीटरची धाव पूर्ण केली आहे. येणाऱ्या काळामध्ये वंदे भारत रेल्वेची अधिक प्रमाणात व गतीने निर्मिती करुन परदेशामध्ये निर्यात करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री वैष्णव यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक अरुणकुमार यांनी स्थानकावर कोच देखभाल सुविधांच्या विकास (पीटलाईन) बाबत सविस्तर अशी माहिती दिली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.