इंदुर :- तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून ही मालिका नावावर केलेल्या यजमान भारतीय संघाला आज येथे होत असलेला तिसराही सामना जिंकत निर्विवाद वर्चस्वासह दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश देण्याची संधी आहे. तर या मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळायची असल्याने हा सामना जिंकून थोडीफार प्रतिष्ठा राखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला विजयाची नितांत गरज आहे.
पहिल्या सामन्यात झालेल्या चुका दुरुस्त करत दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला कडवी लढत दिली. द्वीशतकी धावांच्या आव्हानाचा जिद्दीने सामना करताना त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा उघड्या पाडल्या. हा सामना दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 16 धावांनी जरी गमावला असला तरीही आता यापुढील आव्हान कठीण ठरेल असा इशारा त्यांनी भारतीय संघाला दिला आहे. त्यांच्या फलंदाजांना कसे रोखायचे हा प्रश्न आता भारताच्या अननुभवी गोलंदाजांसमोर निर्माण झाला आहे.
दुसरीकडे भारतीय संघाला या मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची असल्यामुळे गोलंदाजीत प्रयोग करण्याची ही अखेरची संधी आहे. ही मालिका सलग दोन सामने जिंकल्यामुळे त्यांनी खिशात टाकली असली तरीही अखेरच्या सामन्यासह 2018 सालानंतर दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश देण्याचीही संधी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात जास्त डावखुरे फलंदाज असल्याने भारतीय संघात ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आला होता. मात्र, तो फारसा प्रभावी न ठरल्याने आता या अखेरच्या टी-20 सामन्यासाठी लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.
रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा धावांची पस्तीशी किंवा चाळीशी गाठत आहे मात्र, त्याच्या बॅटमधून मोठी खेळी घडलेली नाही. रोहितसाठी इदुरचे मैदान यापूर्वीही अनेकदा लकी ठरले आहे. नेटमध्ये तो पूल शॉटचा कसून सराव करत आहे, कारण तो हा फटका खेळताना सातत्याने बाद होत आहे. त्यामुळे नेटमध्ये त्याने याचा सराव केला असून आता त्याच्या बॅटमधून मोठी खेळी व्हावी अशीच अपेक्षा केली जात आहे.