पावणेदोन वर्षांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार असून, भाजपविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हेदेखील प्रयत्नशील आहेत.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी पाटण्याला जाऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तसेच राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आहे. विरोधी पक्षाकडून नितीशकुमार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले जाईल का अशी पृच्छा केली असता, हा निर्णय सर्व विरोधी पक्ष मिळून घेतील, असे उत्तर राव यांनी दिले. पत्रकार पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत प्रश्न विचारतील, त्याला उत्तरे देण्याच्या भानगडीत पडू नये, असे नितीशकुमार यांचे मत होते. परंतु राव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, या प्रश्नांना उत्तरे न देता पत्रकार परिषद आटोपती घ्यावी असे सुचवून नितीशकुमार यांनी के. चंद्रशेखर राव यांचा अपमान केला, असा आरोप भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. विरोधकांत ऐक्य निर्माण होऊ नये, त्यांच्यात फाटाफूटच व्हावी या हेतूनेच मालवीय यांची ही टिप्पणी असणार, हे उघड आहे.
2024 मध्ये मोदींना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देण्याच्या शर्यतीत अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीशकुमार आणि के. चंद्रशेखर राव ही चार नावे आहेत. शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील शर्यतीत आले असते; पण त्यांना आपला पक्ष टिकवण्यासाठी सध्या संघर्ष करावा लागत आहे. उपरोल्लेखित चारपैकी केसीआर हे सर्वाधिक उत्सुक असे आव्हानवीर आहेत. राष्ट्रीय पातळीवर राजकीय धुरळा उडवून देण्यासाठी ते धडपड करत आहेत. परतुं त्यांना योग्य असे लॉंचिंग पॅड मिळत नाहीये. त्यामुळे त्यांनी “शेतकऱ्यांचे नेते’ अशी आपली प्रतिमा बनवण्याचे ठरवले आहे. देशातील चाळीस शेतकरी संघटनांच्या नेत्यांना त्यांनी चर्चा करण्यासाठी हैदराबादला बोलावले आहे. परंतु दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलन झाल्यानंतर, या शेतकरी नेत्यांना तसे महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे यातून केसीआर काय साध्य करणार, ते कळायला मार्ग नाही.
राव यांनी भाजपविरोधात भूमिका घेतल्यामुळे, भाजपनेही आपल्या पद्धतीने त्यांचा समाचार घेण्याचे ठरवलेले दिसते. दिल्लीमध्ये अबकारी कर अंमलबजावणी धोरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापेमारी झाली. परंतु या गैरव्यवहारात केसीआर यांची कन्या आमदार के. कविता यांचा संबंध असल्याचा आरोप दिल्लीतील भाजप नेत्यांनी केला आहे. के. कविता यांनी दिल्लीचे मद्यधोरण सुलभ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. त्यांनी सिसोदिया यांची हैदराबादमधील अनेक मद्यनिर्मिती कंपन्यांच्या मालकांशी भेट घडवली, असा आरोप भाजपने केला आहे. मात्र भाजप माझ्या वडिलांच्या लोकप्रियतेमुळे घाबरला आहे आणि म्हणूनच माझ्यावर खोटेनाटे आरोप करत आहे, असे प्रत्युत्तर कविता यांनी दिले आहे. आमच्या कुटुंबाने तेलंगणसाठी संघर्ष केला असून, आम्ही केंद्रीय सत्तेविरोधातील लढाईत अजिबात मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्या फेब्रुवारीत केसीआर यांनी मुंबईत येऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. खरे तर, उद्धवजींनीच त्यांना आमंत्रण दिले होते. त्यानंतर मोदी सरकारच्या विरोधात उभयतांनी टीकाही केली होती. त्यावेळी तेलंगणात टीआरएस, म्हणजेच तेलंगण राष्ट्र समितीची अवस्था वाईट आहे, मागील लोकसभेत भाजपच्या चार जागा निवडून आल्या आणि 2024 मध्ये तेलंगणात भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल, असे उद्गार तेव्हाचे विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते.
आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, जेडीएस यांसारख्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून बिगरभाजप आघाडी प्रस्थापित करण्याची योजना केसीआर यांनी आखली असली, तरी अद्याप त्यास यश आलेले नाही. केसीआर यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली आहे. मुंबईतील भेटीत केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबाबत केसीआर यांच्या भूमिकेस उद्धवजींनी समर्थन दिले होते. परंतु त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत उद्धवजींनी कोणतेही मतप्रदर्शन केले नव्हते. कारण केसीआर यांना समर्थन दिल्यास, महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष नाराज होईल, असा विचार शिवसेनेने केला असू शकतो.
तेलंगणमध्ये केसीआर आणि कॉंग्रेस पक्ष एकमेकांच्या विरोधात असून, भाजपविरोधी आघाडी बांधण्यात त्यांनी कॉंग्रेसचा विचार केलेला नाही. केसीआर तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटले होते. केसीआर यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही. फक्त राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर बोलणी झाली, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्षाने पंजाबच्या यशानंतर, गुजरातवर लक्ष्य केंद्रित केले आहे. अबकारी धोरणाच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी भाजपला सणसणीत प्रति-आव्हान दिले आणि मागेच रेटले. केजरीवाल हे सध्या विविध राज्यांचे दौरे करत आहेत. कॉंग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्यामुळे, निर्माण झालेल्या पोकळीत आप हाच पक्ष भाजपला पर्याय होऊ शकतो, या विचारातून केजरीवाल यांच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे ते केसीआर यांच्या आघाडीत सामील होणार नाहीत, असे दिसते.
पार्थो चॅटर्जी यांच्या भ्रष्टाचारामुळे ममतादीदी सध्या बचावात्मक पवित्र्यात आहेत. भारत जोडो अभियानास कितपत प्रतिसाद मिळतो, यावर कॉंग्रेस व राहुल गांधींचे भवितव्य अवलंबून असेल. केसीआर हे अत्यंत महत्त्वाकांक्षी असले, तरी त्यांच्यापासून देशाचे पंतप्रधानपद अजून बरेच दूर आहे.