मुंबई – विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिंदे सरकारकडून नवीन यादी पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेसाठी पाठविलेली 12 आमदारांची यादी रद्द करण्यात यावी, अशी मागणी (Chief Minister Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे केली आहे. आता राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच महाविकास आघाडीला हा आणखी एक धक्का असल्याचे मानले जात आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी असताना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 आमदारांची नावे राज्यपालांना पाठवली होती. मात्र, या यादीवर राज्यपालांनी सुमारे दिड वर्षांपासून कोणताही निर्णय न घेत ती यादी प्रलंबित ठेवली.
दरम्यान, ही यादीच आता रद्द करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने 12 आमदारांची यादी पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपासून राज्यातील राजकारणीय घडामोडींना वेग आला आहे. 2020मध्ये पाठवलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाच्या यादीवर अद्यापही शिक्कामोर्तब झाले नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सरकार येताच आता यावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात सत्तांतर होणार असल्याचे नियोजन सुरू असल्यानेच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी सही केली नव्हती, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.