मुंबई – टोलमुक्तीचे आश्वासन शिवसेना-भाजपचे होते. मात्र, याबाबत आंदोलन मनसेनी केले. मनसेच्या या आंदोलनानंतर राज्यातील 65 टोलनाके बंद करण्यात आले. यावर आता शिवसेना-भाजपला कोणी प्रश्न का विचारत नाही? या टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न होता. मात्र हे टोलबाबतच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच सरकारने दिली नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला.
मुंबईत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. तसेच त्यांनी मनसे आंदोलने अर्धवट सोडते या आरोपावरही उत्तर दिले.
राज ठाकरे म्हणाले, इतर राजकीय पक्ष स्वत: काहीही काम करत नाही आणि आपल्या पक्षाबाबत खोटा प्रचार करतात. या अपप्रचाराला उत्तर दिली पाहिजे. त्या-त्या पक्षातल्या राजकीय नेत्यांना टोलबाबत विचारले पाहिजे. टोल बंद करणार असं शब्द या राजकीय पक्षांनी दिला होता. तरीही आज इतक्या वर्षानंतर टोल सुरू आहेत. तसेच हातात सत्ता द्या बाकी टोलही बंद करून देतो, असेही ते म्हणाले.
तसेच राज्यात सध्या उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणे राजकारण सुरु आहे. 2019 ला मतदारांनी मतदान केले ना, त्याला कळत सुद्धा नसेल कुणाला मतदान केले. कोण कुणामध्ये मिसळले हे कळत सुद्धा नसेल. हे जर राजकारण असं तुम्हाला वाटत असेल तर हे तात्पुरती आर्थिक सोय आहे, असा निशाणाही त्यांनी शिंदे गटावर साधला.