अलाहाबाद – एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यासाठी त्याच्या पत्नीचा अधिकार आहे. पत्नी हयात असेल तर बहिण भावाच्या जागेवर नियुक्ती मागू शकत नाही. तिने आपल्या चरितार्थासाठी अन्य नियमांनुसार दावा करावा असे महत्वपूर्ण निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने या संदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी दिले.
मोहिनी नामक महिलेने ही याचिका दाखल केली होती. त्यानुसार तिचे पिता कानपूर पालिकेत सफाई कामगार होते व त्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला आहे. त्यानंतर अनुकंपा तत्वावर त्यांच्या भावाला पित्याच्या जागी नोकरी मिळाली. त्यांचे संपूर्ण कुटुंब भावावरच अवलंबून होते.
आता भावाच्या मृत्युनंतर आपल्या नोकरी मिळावी. त्यावर भावाचे लग्न झाले असल्यामुळे त्या नोकरीवर अगोदर त्याच्या पत्नीचा अधिकार असल्याचे न्या. नीरज तिवारी यांनी सांगितले. तसेच भावाच्या पत्नीने अगोदरच नोकरीवर दावा केला आहे. त्यामुळे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याची बहिणीची मागणी योग्य नसल्याचे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळली.