मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात झालेल्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला हा तपास एटीएसकडे वर्ग केला होता.
या प्रकरणाचा तपास यापूर्वी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) विशेष तपास पथकाकडून केला जात होता. एसआयटीतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी शनिवारी न्यायालयाला सांगितले की, तपासासाठी एटीएसचे अधिकारी आणि सीआयडी एसआयटीच्या तीन अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
पानसरे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जानुसार हा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आला होता. पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात गोळ्या झाडल्या गेल्या आणि काही दिवसांनी म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. सीआयडीने या प्रकरणाचा तपास करत काही जणांना अटक केली होती.