मुंबई – पावसाळी अधिवेशननाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी देखील विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर एकजुटीने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांच्या निशाण्यावर शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेले आमदार असल्याचे पाहायला मिळाले.
काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी ५० खोके एकदम ओक अशी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. आज मात्र ही घोषणा बदलल्याचे दिसून आले. आज विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी” अशी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला गेल्याची आठवण या निमित्ताने विरोधकांनी करून दिल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकजुटीने सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले.
ऐतिहासिक क्षण
विधानसभेसह विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरवात झाली. काल विधानसभेत राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषणे झाली. विधान परिषदेत मात्र याआधी कधीही न पाहायला मिळालेले ऐतिहासिक चित्र दिसून आले. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे आहेत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे हे देखील शिवसेनेचे आहेत. सध्याच्या राजकीय पेचामुळे एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र दिसून आले.