पाटण (प्रतिनिधी) – राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणावर जलसंपदा विभागाने केलेल्या विद्युत रोषणाईने पर्यटकांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोयना धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहिल्यांदाच करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे कोयना धरणाचा नटलेला नयनरम्य नजारा पर्यटकांनी डोळ्यात साठवण्यासाठी काल मोठी गर्दी केली होती.
सिंचन तसेच प्रामुख्याने विजेची गरज भागवण्याची किमया कोयना प्रकल्पाने केली आहे. राज्याला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कोयना प्रकल्पाचा मोठा हातभार आहे यामुळे राज्याच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा होतो. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोयना प्रकल्पावर जलसंपदा विभागाने १५ ऑगस्ट रोजी विद्युत रोषणाई केली होती.
अतिशय रोमहर्षक पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई तसेच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा आवाज यामुळे कोयना धरणाचा परिसरात पर्यटकांचे आकर्षण ठरले. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच बाहेरच्याही पर्यटकांनी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोयना धरणावर गर्दी केली होती कोयना धरण व्यवस्थापनाने अतिशय सुयोग्य नियोजन करून पर्यटकांची नोंद करून पर्यटकांना विद्युत रोषणाई पाहण्यासाठी सोडण्यात येत होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
रोषणाईमध्ये धरणाच्या सहा वक्र दरवाजातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सुरुवातीला केशरी नंतर पांढरा व नंतर हिरवा असे अप्रतिम लाइटिंग करण्यात आले होते. तर सहा वक्र दरवाजातूनच पडण्यात येणाऱ्या पाण्यावर लेझर शोद्वारे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जय हिंद, जय भारत, इंडिया अशी अक्षरे येत होती.
“कोयना धरण व्यवस्थापनाने तसेच शासनाच्या जलसंपदा विभागाने कोयना धरणावर केलेली विद्युत रोषणाई अप्रतिम आहे. लेझर शो द्वारे भारताच्या झेंड्याप्रमाणे रंगसंगतीत धरणातून सोडण्यात येणारे पाणी व धरणाचा परिसर अप्रतिम दिसत होता. याची प्रसिद्धी केली असती तर पर्यटकांची संख्या वाढली असती.”
– मनोज काजवे पर्यटक कराड.
कोयना प्रकल्पाची माहिती देणारे यशोगाथा केंद्र तसेच नेहरू उद्यान बंद आहे. पर्यटकांचे खास आकर्षण सलेले नौकाविहार राज्य शासनाच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे बंद करण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक फटका येथील पर्यटन व्यवसायावर झाला आहे. मात्र, 15 ऑगस्ट रोजी विद्युत रोषणाईमुळे पर्यटनासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत.