बारामती – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असताना महावितरणकडूनही हा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. सोमवारी एकाच दिवशी बारामती परिमंडलात १४ ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात ७७६ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. बार्शी विभागात सर्वाधिक २२३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी महावितरण बारामती परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना सोमवारी रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन केले होते. त्यासोबतच ‘एक दिवस-एक गाव’ उपक्रम, वडूज विभागात आजी-माजी सैनिकांसाठी तक्रार निवारण दिवस, वीज जोडण्या देणे, कार्यालयीन परिसराची स्वच्छता असे उपक्रम राबविण्याबाबतही आवाहन केले होते. शिक्रापूर, शिरुर आदी ठिकाणी मोटारसायकल रॅली काढून वीज योजनांबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली.
सोमवारी (दि. ८) रोजी एकाच दिवशी झालेल्या रक्तदान शिबीरात बारामती विभागातील दोन संकलन केंद्रावर ८१, केडगाव येथे ४८, सातारा ७५, फलटणच्या दोन केंद्रावर १२८, कराड विभागात दोन ठिकाणी १०७, पंढरपूर ३ ठिकाणी ११४ व बार्शी विभागातील ३ संकलन केंद्रावर सर्वाधिक २२३ रक्तदान झाले.
सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने महावितरणच्या रक्तदान शिबीरांनी तो दूर करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अधीक्षक अभियंते गौतम गायकवाड, संतोष सांगळे व चंद्रशेखर पाटील यांचेसह सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी परिश्रम घेतले आहेत. महावितरणच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.