नवी दिल्ली – अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. आता या कार्यक्रमाचा 14 वा सीझन रविवार 7 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी अनेक सामान्य व्यक्तींचे नशीब बदलून टाकले आहे. आता पुन्हा सुरू झालेल्या या कार्यक्रमातून ते प्रेक्षकांचे त्यांच्या स्टाईलने मनोरंजन करताना पहायला मिळत आहेत.
या शोद्वारे कुणी लखपती तर कुणी करोडपती बनतात. काही जणांच्या नशिबी निराशा येते. मात्र अमिताभ बच्चन यांचे नशीब मात्र या शो द्वारे पहिल्यापासून चांगलेच उजळून निघाले आहे.
कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा पहिला सीझन 2000 मध्ये सुरू झाला होता. आता त्याला 22 वर्षे झाली. आता कार्यक्रमाचा 14 वा सीझन सुरू झालेला आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनातून त्यांना मानधन म्हणून भलीमोठी रक्कम मिळत असते. 2000 मध्ये पहिल्या सीझनमधील प्रत्येक भागासाठी त्यांनी 25 लाख रुपये मानधन घेतले होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या सीझनमध्येही सूत्रसंचालकाची भूमिका बजावली.
तिसऱ्या सीझनमध्ये त्यांच्याऐवजी शाहरूख खानची एन्ट्री झाली होती. चौथ्या सीझनला पुन्हा अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करू लागले. पाचव्या सीझनपासून त्यांचे प्रत्येक भागाचे मानधन एक कोटी रुपयांवर पोचले होते. सहाव्या सीझनला त्यांनी प्रत्येक भागासाठी दीड कोटी रुपये घेतले. सातव्या सीझनला त्यांचे मानधन दीड कोटी रुपयांच्या आसपास होते.
आठव्या सीझनला प्रत्येक भागासाठी दोन कोटी रुपये तर नवव्या सीझनला 2.60 कोटी रुपयांवर त्यांचे मानधन पोचले. अकरा ते तेराव्य सीझनला त्यांचे मानधन प्रत्येक भागासाठी 3.5 कोटी रुपये होते तर आता चौदाव्या सीझनसाठी ते प्रत्येक भागाला चार ते पाच कोटी मानधन घेत आहेत.