केवळ रिमझिम पावसाची हजेरी
समीर भुजबळ
वाल्हे – वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु जून, जुलै महिना संपूर्ण संपला तरीही रिमझिम पाऊस सोडून मोठा पाऊस पडला नसल्याने, अनेकांनी खरीप हंगामातील पिकांकडे विशेषत: बाजरीच्या पेरणीकडे पाठ फिरविली. दरम्यना, बाजरीचा पेरा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण गणितच बिघडलेले आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बाजरीच्या खुरपण्या सुरु व्हायला पाहिजे होत्या; मात्र मान्सूनपूर्व व मान्सूनच्या मोठ्या पावसाने दडी मारली होती. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बाजरी खुरपणे काही ठिकाणी दिसत आहे. यावर्षी वाल्हे परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन-तीन दिवसापूर्वी पुरंदर तालुक्यातील काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडला. माञ, वाल्हे परिसरात पावसाची फक्त रिमझीम सुरू होती. तसेच मान्सूनपूर्व पाऊसाने यावर्षी दडी यावर्षी मान्सून पूर्व पाऊस वाल्हे परिसरामध्ये अत्यंत कमी प्रमाणात झाला आहे, त्यामुळे अनेक शेतकरी उसाची लागवड करावी की बाजरी उत्पन्न घ्यावे, या द्विधा मनःस्थितीत आहेत.
दरम्यान, दमदार पाऊस पुढे होईल की नाही याचा भरोसा नसल्याने थोड्या पाण्यावर बाजरीचे पिक येऊ शकते या आशेवर बाजरीची पेरणी शेकऱ्यांनी केली आहे.
मागील तीन वर्षांतील पाऊस
6 ऑगस्ट 2020 पर्यंत 299 मिलीमीटर पाऊस पडला होता. तसेच त्या वर्षभरात अंचाकी 826 मिलीमीटर पाऊस पडला होता. मागील वर्षी आज अखेर 6 ऑगस्ट 2021 पर्यंत 235 मिलीमीटर पाऊस पडला होता. तर संपूर्ण वर्षभरात 399 मिली मिटर पाऊस पडला होता. चालू वर्षी 6 ऑगस्ट 2022 अखेर फक्त 147 मिलीमीटर पाऊस पडला आहे, अशी माहिती वाल्हे महसूल विभागाकडून तलाठी निलेश अवसरमोल यांनी दिली.
…447 हेक्टरने कमी
वाल्हे परिसरात चालू हंगामात फक्त 677 हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 6 ऑगस्ट अखेर बाजरीची पेरणी जवळपास 447 हेक्टरने कमी झाली आहे. अशी माहिती कृषी सहाय्यक गीता पवार, मयुरी नेवसे यांनी दिली.