पिंपळे गुरव, दि. 7 (वार्ताहर) -पिंपरी चिंचवड शहरात व उपनगरांमध्ये महापालिकेची विकासकामे आणि महावितरणच्या वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याला अक्षरशः नागरिक वैतागले आहेत. नवी सांगवी येथे मागील काही महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु महावितरण महापालिकेच्या विकासकामांमुळे आमच्या भूमिगत विद्युत वाहिन्या नादुरुस्त होत असून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सांगवीवर यांच्या अजब कारभाराने हैराण झाले आहेत.
नवी सांगवीच्या विविध भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. स्वामी विवेकानंद नगर, सनशाईन रेसिडेन्सी, समतानगर, गणेशनगर, आदर्शनगर, चैत्रबन, समर्थनगर, संत तुकारामनगर परिसरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तर काही भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. काही वेळेस दहा ते बारा तास वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात येत आहे. तर बहुतांश वेळा वीजपुरवठा बंद आहे हे देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती होत नाही.