नवी दिल्ली, दि. 5 -जागतिक उत्पादन केंद्र बनवायचे असल्यास जमीन व्यवस्थापन पद्धती निर्दोष असली पाहिजे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे. खासगी क्षेत्राच्या सहकार्याने, सीओई-एसयूआरव्हीईआय जमिनीचे सर्वेक्षण, विश्लेषण आणि व्यवस्थापनाशी संबंधित देशाच्या आवश्यकता भागवणारे एक थांबा केंद्र म्हणून होण्याच्या दिशेने झपाट्याने पुढे जात आहे. सीओई-एसयूआरव्हीईआयने विकसित केलेल्या उपयोजनांमध्ये त्वरित बदल शोधणे, जमिनीच्या वापराचे विश्लेषण आणि 3-डी प्रतिमा विश्लेषण यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
उपग्रह आणि मानवरहित रिमोट वाहन उपक्रम उत्कृष्टता केंद्राने (सीओई-एसयूआरव्हीईआय) विकसित केलेल्या भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित उपयोजनद्वारे माहितीचा प्रसार करण्याकरता वेबिनारचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या उपयोजनांचा वापर सर्व केंद्र आणि राज्य सरकारांचे विभाग, नगरपालिका आणि विकास प्राधिकरणे यांनाही करता येणार असल्याचे ते म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चेंज डिटेक्शन सॉफ्टवेअर हे संरक्षण खात्याच्या जमिनीवर झालेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे त्वरित शोधून काढते. या उपयोजनात नॅशनल रिमोट सेन्सिंग केंद्रांकडे आलेल्या उपग्रहीय प्रतिमांचा उपयोग केला जातो. ते सर्व 62 कॅंटोन्मेंट बोर्ड (छावणी मंडळ) भागांत तैनात केले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जमिनीवर कायमस्वरूप कोणते बदल झाले आहेत, ते ओळखण्यास सक्षम होतात.
हे बदल अधिकृत आहेत की सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीविना करण्यात आले आहेत, हे तपासण्यासाठीही ते सक्षम होतात. यामुळे सीईओंना अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणांविरोधात आवश्यक ती प्रशासकीय कारवाई योग्य वेळेत सुरू करण्यास मदत होते. याआधी, अशी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे ही प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहून शोधावी लागत होती. हे सॉफ्टवेअर परिणामकारक आणि वेळेची बचत करणारे आहे. ज्यामुळे जमीन धारणा विभाग आणि जमीन वापर करणाऱ्या विभागांची देखरेख करण्याची क्षमता वाढेल, असे ते म्हणाले. तसेच अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांना रोखता येईल असेही त्यांनी सांगितले.