संतोष कचरे आंबेगाव बुद्रुक, दि. 4 -आंबेगाव परिसराचे भूषण असलेल्या जांभुळवाडी पाझर तलावाची निर्मिती 1972मध्ये करण्यात आली. अंदाजे साधारण 70 एकर जमिनीमध्ये हा तलाव पसरला आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपीची सुविधा म्हणून या तलावाकडे आजही पाहिले जाते. परंतु, या तलावाच्या विकासाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पाटबंधारे खाते आणि महानगरपालिका यांच्यातील तांत्रिक वादात या तलावाचा विकास खुंटला आहे.
गाळच काढला नाही
महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या तलावाचा विकास होईल, अशी अशा होती. परंतु, तलाव परिसरातील चोहोबाजुच्या सोसायट्यांचे सांडपाणी तलावात सोडले जात आहे. ते थांबवण्यासाठी तलावाच्या चारही बाजूनी ड्रेनेज लाइन टाकण्यासह सांडपाण्याचा निचरा करण्यात यावा. तसेच तिन्ही बाजूने वाढत असलेली अतिक्रमणे याचा परिणाम तलावाच्या बुढीत क्षेत्र कमी होण्यावर तसेच पाणी साठवण क्षमतेवर होत आहे. तलावातील गाळ कित्येक वर्षापासून काढण्यात आलेला नसल्यानेही साठवण क्षमता कमी झाली आहे.