मुंबई – रशिया- युक्रेन युद्ध अजून औपचारिकरित्या समाप्त झाले नसतानाच तैवानवरून अमेरिका -चीनदरम्यान संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. भारतीय शेअर बाजारात सकाळी खरेदी विक्रीच्या जोरदार लाटा येत होत्या. मात्र दिवसाअखेर शेअर बाजार निर्देशांकात अल्प वाढ झाली.
गेल्या पाच दिवसापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 20 अंकांनी वाढून 58,136 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ पाच अंकांनी म्हणजे 0.03 टक्क्यांनी वाढून 18,345 अंकावर बंद झाला.
भारतीय बाजारामध्ये खरेदी झाल्याबद्दल जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिका -चीन तणावामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण होणे साहजिक आहे. मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतात खरेदी करणे चालूच ठेवले आहे. त्याचबरोबर डॉलर घसरून रुपया वधारत असल्यामुळे भारताला त्याचा फायदा होणार आहे.
दरम्यानच्या काळात भारतातील कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात वातावरण मंगळवारी सकारात्मक राहिले. इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बॅंक, महिंद्रा या कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाली. टेक महिंद्रा, टाटा स्टील, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण नोंदली गेली.
अमेरिकेचे काहीसे मवाळ पत धोरण जाहीर झाल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी चालूच ठेवली असून सोमवारी या गुंतवणूकदारानी 2,320 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्याचबरोबर युरोप, अमेरिकेतील मंदीमुळे कच्च्या तेलाची मागणी कमी होऊ लागल्यामुळे आता कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर पेक्षा कमी झाले आहेत.
यामुळेही भारतीय शेअर बाजारामध्ये खरेदी झाली असल्याचे दिसून येते. ऊर्जाक्षेत्र, ग्राहक वस्तू, वाहन इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर रिऍल्टी, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण नोंदली गेली असल्याचे दिसून आले.