नवी दिल्ली – गेल्या सहा महिन्यात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. या बाबीकडे विरोधी पक्षांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संसदेत लक्ष वेधले. यावेळी सितारामन यांनी भारतीय रुपया अजिबात कोसळलेला नाही असा दावा केला.
भारतीय रुपयाचे मुल्य इतर चलनाप्रमाणे गेल्या सहा महिन्यात कमालीचे अस्थिर आहे ही बाब त्यांनी मान्य केली. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक भारतीय रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. रुपयाचे म्हणले एखाद्या विशिष्ट पातळीवर असावे हे आपण ठरवू शकत नाही. जागतिक व्यापार आणि इतर घडामोडीचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत असतो.
मात्र आयात करणाऱ्यांना आणि निर्यात करणाऱ्यांना निर्णय घेता येणे सोपे व्हावे याकरिता कृपयाच्या मूल्यातील अस्थिरता कमी करण्याचा रिझर्व्ह बॅंक आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य काही प्रमाणात कमी झाले असले तरी जगातील इतर चलनाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारले असल्याच्या दाव्याचा त्यांनी पुनर्विचार केला.
भारताकडे 571 अब्ज डॉलरचे परकीय चलन आहे. त्यामुळे भारताला या आघाडीवर चिंता करण्याची कसलीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातील भारतीय नागरिकांना भारतात परकीय चलनाच्या माध्यमातून पैसे पाठविण्याची मुभा देण्यात यावी या मागणीबद्दल त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंक या विषयावर विचार करेल.
दहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर भारतीय रुपयाच्या मूल्यावर प्रचंड परिणाम झाला होता. तसा परिणाम यावेळी झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, भारताकडे सध्या 571 अब्ज डॉलरचा साठा आहे. ही रक्कम छोटी नाही. त्यामुळे परकीय व्यापारावर दरम्यानच्या काळात कसलाही परिणाम होणार नाही. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारताची विविध क्षेत्रातील निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
या प्रयत्नांना यश येत आहे. मात्र युद्ध आणि कोरोनामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्याबरोबर जागतिक व्यापारावरही परिणाम झाला आहे. त्याचा थोडाफार परिणाम भारतीय व्यापारावर आणि रुपयावर होणे अपेक्षित आहे असे त्यांनी सुचित केले. 2004 ते 14 या काळात भारतीय रुपयाचे मूल्य ज्या प्रमाणात कोसळले होते त्या प्रमाणात 2014 ते आतापर्यंत या मूल्यावर परिणाम झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.