पोर्ट ऑफ स्पेन – वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारताने डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे 119 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने यजमानांना मायभूमीत पहिल्यांदाच व्हाईट वॉश दिला आहे. या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने झंझावाती नाबाद 98 धावांची खेळी केली. तर फिरकीपटू यझुवेंद्र चहलने 4 गडी बाद करत विजयात मोलाची भूमिका पार पाडली.
पावसाच्या व्यत्ययामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 36 षटकांत 3 बाद 225 धावा केल्या होत्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार यजमानांना 35 षटकांमध्ये 257 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, विंडीजचा संघ 26 षटकांमध्येच 137 धावांवर गारद झाला.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने निर्णायक सुरुवात करून दिली. शिखर अर्धशतक (58) झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला. नंतर श्रेयस (44) आणि पाठोपाठ सूर्यकुमार (8) बाद झाला. पण गिलने फटकेबाजी कायम ठेवली. पण सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब झाला अखेर 36 षटकानंतर सामना थांबवण्यात आला. गिलने नाबाद 98 धावा केल्या.
प्रत्युत्तरात सिराजने पहिल्या षटकातच विंडीजला दोन झटके दिले. त्यानंतर एक-एक करत गडी बाद होत गेले. वेस्ट इंडिजकडून कर्णधार निकोलस पूरन आणि ब्रॅंडन किंग यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या. पण भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर कोणाचाच निभाव लागला नाही. भारताकडून यझुवेंद्र चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शार्दूल आणि सिराजने प्रत्येकी दोन, तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी एक-एक विकेट घेतली.