मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांपासून ते सत्ता गमावलेल्या शिवसेना पक्षाबाबत आपले सडेतोड मत व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी सध्याची राजकीय परिस्थिती उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आगामी महानगरपालिका याबाबत सविस्तरपणे भाष्य केलं आहे.
आगामी काळात भाजपसोबत युती करणार का असा सवाल देखील यावेळी राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले,”आता मला याबाबत उत्तर देता येणार नाही. या जर-तर मधल्या गोष्टी आहेत. आम्ही पक्षामध्ये निवडणूक कशी लढवायची याचाच विचार करून पुढे जाणार असल्याचे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. कोणी युतीचा विचार करून पक्ष बांधायला घेतला तर पक्ष बांधलाच जाणार नाही, या आयत्या वेळी येणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण जर तर मध्ये नको जायला ” अस राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंनी प्रचारादरम्यान आपला अजेंडा अनेकदा जनतेसमोर मांडलेला आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या सभांना प्रचंड गर्दी झालेली अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. मुंबई महापालिकेत मनसे सत्तेत आली तर तुम्ही वेगळं काय कराल असा सवाल यावेळी राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता राज ठाकरे म्हणाले, “एका वाक्यात सांगतो जे तुम्ही पाहिलं नाही ते मी करून दाखवेल आणि त्या गोष्टी काय काय असतील ते माझ्या जाहीरनाम्यात येईल” असं ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील राजकारण आणि सध्या असलेली राजकीय पक्षांची स्थिती याबाबत राज ठाकरेंनी सडेतोड पद्धतीने उत्तरे दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले. आता इतर राजकीय नेते याबाबत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.