रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर, दि.७ (प्रतिनिधी) : राजगुरूनगर शहरात आज (दि.७) सकाळी ८ वाजल्यापासून. ट्राफिक झाल्याने नोकरदार वर्गासह शाळकरी विद्यार्थ्यांना अडकून पडावे लागले. राजगुरूनगर शहरात वाहतूक कोंडी दिवसागणिक वाढत आहे. नगर परिषद व पोलिसांकडून यावर प्रभावी उपाययोजना होत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नागरिक, नोकरदार, विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
राजगुरूनगर शहरातुन जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. राजगुरूनगर शहरातील अरुंद पुल व बेदखल वाहन चालक यांच्यामुळे वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे. रस्त्यावर काम गेली काही वर्षे सुरू आहे तेही पूर्ण होत नसल्याने पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिक याना तासनतास अडकून बसावे लागत आहे.
आज सकाळी जोराचा पाऊस होता त्यातच जैन बांधवांचा चातुर्मास सुरू झाल्याने येथील महामार्गालगत असलेल्या हुतात्मा राजगुरू,भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून शहरातून जैन गुरूंची मिरवणूक काढण्यात आली.यामुळे वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. सगळ्यात हेवी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाश्यांचे मोठे हाल झाले.
या कोंडीचा मोठा त्रास पुणे येथे अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना झाला. राजगुरूनगर शहरातील हेवी वाहतूक कोंडीतून पुणे नाशिककडे जाण्यासाठी अडकून राहावे लागले. आतापर्यंत राजगुरूनगर, चाकणच्या वाहतूक कोंडीत वेळेत उपचाराअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. आज सकाळ पासून सुरू असलेली वाहतूक कोंडी आतापर्यंत जैसे थे आहे.