सादिक सय्यद
पाचगणी – महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलेल्या महाबळेश्वरच्या दरे तांब गावाचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याने “गड घेऊन सिंह आला’ अशी कौतुकपूर्ण प्रतिक्रिया महाबळेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव. मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडताच दरे गावच्या ग्रामस्थाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर कित्येकांना आकाश ठेगणं वाटायला लागले आहे. दुर्गम दरे गावातून हलाखीची परिस्थिती असल्यामुळे ठाणे येथे जाऊन कंपनीत काम करुन उपजिविकेचा गाडा ओढताना रिक्षा चालवून आपल्या पोटाची खळगी भरली.
मराठी माणसाचा स्वभिमान सदैव बाळगणाऱ्या एकनाथ शिंदे वयाच्या 18 व्या वर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाण्यातील शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. मितभाषी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलने केली. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे बाळकडू घेतलेले एकनाथ शिंदे यांची घुसमट झाली आणि त्यांनी 40 आमदारांचा गट करुन वेगळा निर्णय घेतला.
अखेर उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा व विधानसभा सदस्याचा राजीनामा दिल्याने सरकार कोसळले. महाबळेश्वर तालुक्याचा सुपुत्र एकनाथ शिंदे हा सिंह सत्तेचा गड घेऊन आला याचा अनंद व्यक्त होत आहे.