बर्मिंगहॅम – नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत खेळू शकणार नसल्याने निवड समितीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. मात्र, संघात माजी कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा व ऋषभ पंत असतानाही बुमराहकडे नेतृत्व कसे सोपवले गेले असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, बुमराह संघाचा उपकर्णधार आहे व नियमित कर्णधार खेळणार नसेल तर उपकर्णधारालाच नेतृत्व दिले जाते, असा खुलासा संघ व्यवस्थापनाने दिला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हाच बुमराकडे संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले होते. कोहलीकडून संघाचे कर्णधारपद रोहितकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे कोहली यावेळी जर संधी असेल तर कर्णधारपद स्वीकारणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न निवड समितीपुढे होता. त्यामुळे निवड समितीने कोहलीला विचारणा केली नसल्याचे समजते आहे.
निवड समितीपुढे पंतचाही एक पर्याय होता. दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत पंतच्या नेतृत्वावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे या टीकेचा जर विचार केला, तर त्याच्याकडे कर्णधारपद न देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असावा असे सांगितले जात आहे. संघात चेतेश्वर पुजारा हा देखील अनुभवी खेळाडू आहे व त्यालाही नेतृत्व करण्याची संधी होती. मात्र, त्याची वैयक्तिक कामगिरी सुमार होत असल्याने तसेच त्याचे संघातील स्थानही निश्चित मानले जात नसल्यानेच कर्णधारपदासाठी त्याचा विचार झाला नसावा.