इस्लामाबाद – इम्रान खान सरकारच्या राजवटीतच पाकिस्तानात दहशतवाद वाढला असा आरोप विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे. दहशतवादाविरुद्ध राष्ट्रीय कृती योजना कार्यक्षमतेने लागू करण्यात इम्रान खान यांचे सरकार अपयशी ठरले. खरे म्हणजे त्यांच्या राजवटीत ही योजनाच देशात गेली चार वर्ष अस्तित्वात नव्हती. त्याचा फायदा उठवत दहशतवादी संघटनांनी आपली ठाणी मजबूत केली असा आरोपही त्यांनी केला आहे.
पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीज च्या अहवालात असे दिसून आले आहे की 2021 मध्ये अतिरेक्यांनी पाकिस्तानात 294 हल्ले केले, ज्यात 388 लोक मारले गेले आणि 606 जखमी झाले, त्याचा संदर्भही पंतप्रधान शरीफ यांनी दिला आहे. लाहोरमध्ये, कायदा आणि सुव्यवस्था स्थितीच्या संबंधात आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की मागील सरकारने दहशतवादाच्या विरोधातील उपाययोजनांना कसलेच महत्व दिले नाही. 16 डिसेंबर 2014 रोजी आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात किमान 132 मुलांसह 149 लोक मारले गेले. हल्ल्यानंतर, एकत्रित राष्ट्रीय प्रयत्नाद्वारे दहशतवाद्यांवर कठोरपणे कारवाई करण्यासाठी देशव्यापी सहमती झाली होती.
हे लक्षात घेऊन, अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने दहशतवाद रोखण्यासाठी 20 सूत्री योजना तयार केली होती व त्याला 24 डिसेंबर 2014 रोजी संसदेने मंजुरीपण दिली होती.पण इम्रान सरकारने त्याकडे नंतर पुर्ण दुर्लक्ष केले. मागील सरकारच्या राजवटीत केवळ दहशतवादच नव्हे तर देशातील गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.