प्रा. शामकांत देशमुख
सध्या महाराष्ट्रात अनेक महाविद्यालये ही स्वायत्त होत आहेत. प्रवेश घेते वेळी पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम व शंका स्वायत्त महाविद्यालयाबाबत असतात, हेच लक्षात घेऊन लेखाचे प्रयोजन.
केंद्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्या उच्च शिक्षणाच्या धोरणांनुसार ज्या महाविद्यालयांचे नॅक या संस्थेद्वारे मूल्यांकन झाले असल्यास व ज्या महाविद्यालयांना ए, ए+ व ए++ श्रेणी व दर्जा नॅककडून प्राप्त असल्यास अशी महाविद्यालये संलग्न विद्यापीठाचे व शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे ना हरकत पत्र प्राप्त करून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करू शकतात. ज्या महाविद्यालयांना नॅककडून ए+ व ए++ श्रेणी आहे, अशा महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून तज्ज्ञ समितीच्या भेटी शिवाय स्वायत्त दर्जा बहाल केला जातो, तर ए श्रेणी प्राप्त असलेल्या महाविद्यालयांना तज्ज्ञ समिती प्रत्यक्ष भेट देऊन विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अहवाल सादर करून शिफारस करते. त्यानंतर अशा महाविद्यालयांना स्वायतत्ता बहाल करण्यात येते.
महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल करण्यामागे केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोग यांची भूमिका समजावून घेऊया. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य दिल्याने गरजेप्रमाणे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत व संशोधनाला चालना मिळेल. उत्तम मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल व त्यातूनच देशाची प्रगती होऊ शकते हे ओळखून महाविद्यालयांची स्वायतत्ता ही संकल्पना पुढे आली.
स्वायत्तता बहाल झाल्यानंतर अशी महाविद्यालये हे कायम त्या त्या विद्यापीठाशी संलग्न असतात, हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. याबाबतीत पालक व विद्यार्थी वर्गात मोठा संभ्रम असतो. अशा स्वायत्त महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास महाविद्यालय व विद्यापीठाकडून संयुक्तरित्या पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्याला बहाल करण्यात येते व प्रत्येक गुण पत्रकेवर संबंधित महाविद्यालय व विद्यापीठ या दोन्हीचा स्पष्ट उल्लेख असतो.
काही स्वायत्त महाविद्यालयांशी कनिष्ठ महाविद्यालय (11वी, 12वी वर्ग) जोडलेली असतात. असे जरी असल्यास अशा कनिष्ठ महाविद्यालयाचा स्वायत्त महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसतो. थोडक्यात, स्वायत्तता ही वरिष्ठ महविद्यायलयास म्हणजे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमापुरती मर्यादित असते. कनिष्ठ महाविद्यालय हे संबंधित उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न असतात.
स्वायत्त महाविद्यालय विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करू शकतात. अभासक्रमात कालानुरूप योग्य ते बदल सहज व लवकर करू शकतात. महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्तर व दर्जानुसार अभ्यासक्रमात बदल केले जाऊ शकतात.
अभ्यास क्रमात नावीन्यपूर्ण, औद्योगिक, सेवा, आयटी, बॅंकिग, कॉर्पोरेट, संशोधन क्षेत्रांशी संबंधित मनुष्यबळाच्या गरजेनुसार तात्काळ बदल करणे सोपे व सोयीचे असते. अशा अभ्यासक्रमाची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात व याबाबतीत महाविद्यालयास संपूर्णपणे स्वातंत्र्य असते.निवडलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास पूरक कौशल्य विकसित होण्यासाठी जास्तीचे अभ्यासक्रम, मूल्यवर्धित, प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून दिले जातात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वातंत्र्यही मिळते. ते आपल्या आवडीचा एखादा अभ्यासक्रम निवडून त्याचे श्रेयांक मिळवू शकतात. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरची गरज ओळखून नवनवे अभ्यासक्रम तयार करून मनुष्यबळ निर्मितीत भरीव योगदान देऊ शकतात.
ठराविक साचेबद्ध, सर्वसमावेशक पद्धतीने बनवलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा आपल्या कुवतीप्रमाणे नावीन्यपूर्ण व काळानुरूप बदल केलेला अभ्यासक्रम स्वीकारणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत हिताचे ठरते. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम स्वायत्त महाविद्यालय व विद्यापीठ यांचे स्वतंत्र व वेगळे असतात. हे ठरविताना विद्यापीठांना शहरी, ग्रामीण भाग, सर्वसाधारणपणे उपलब्ध पायाभूत सुविधा, भौगोलिक परिस्थिती विचारात घ्यावा लागतात, तर स्वायत्त महाविद्यालय त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, भौगोलिक परिस्थिती, मनुष्यबळ या बाबी विचारात घेऊन पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम ठरवितात. त्यामुळे जास्त प्रभावीपणे अंमलबजावणी करणे सोपे जाते.
उदाहरण द्यायचे झाल्यास बी. कॉमचा अभ्यासक्रम विद्यापीठाचा वेगळा असेल, तर स्वायत्त महाविद्यालयाचा वेगळा असेल. तर नव्याने जीएसटी सारखी संकल्पना आल्यास तात्काळ स्वायत्त महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात तिचा अंतर्भाव करणे शक्य होते व त्या क्षेत्राची मनुष्यबळाची गरज भागविता येते. अशी उदाहरणे प्रत्येक शाखेबाबत देता येतील.
स्वायत्त महाविद्यालयास विविध विषयांची स्वतंत्र अभ्यास मंडळे असतात, तर अभ्यास मंडळाकडून मान्य झालेल्या अभ्यासक्रमास विद्या परिषद मान्यता देते. स्वायत्त महाविद्यालयास स्वतंत्र महाविद्यालयीन विकास समिती, नियामक मंडळ व अर्थ समिती असते. याद्वारे महाविद्यालयाचे नियमन चालते. त्यामध्ये विविध घटकांचे प्रतिनिधी असतात.
स्वायत्त महाविद्यालयांना त्यांची परीक्षा पद्धत राबविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. गुण पद्धतीचा अवलंब करावा की श्रेयांक पद्धतीचे अवलंबन करावे. वर्षाअखेरीस परीक्षा घेण्यापेक्षा सातत्याने ठराविक अंतराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन होणे खूप फायद्याचे व हिताचे ठरते. अशा प्रकारे अभ्यासक्रमाच्या विषयानुसार स्वतंत्र मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करता येतो. सातत्याने विविध प्रकारच्या परीक्षांमधून संबंधित विषयाच्या ज्ञानाबाबत मूल्यांकन होत असल्याने विद्यार्थी कायम अभ्यासात कार्यमग्न राहातात, त्यांची आवड व रुची वाढते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करताना ते स्वतःला झोकून देऊन प्रयत्न करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती वाढते. सहयोगी विद्यार्थ्यांबरोबर वार्तालाप, चर्चा, विचारांची देवाण घेवाण होते. संघटन कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होते. आपापसात निकोप स्पर्धा निर्माण होते. या सर्व गोष्टींचा अंतिम परिणाम चांगला होतो.
स्वायत्त महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यापीठाचे व शासनाचे सर्व निकष, मार्गदर्शक तत्त्वे, बिंदूनामावली यांचे पालन करणे क्रमप्राप्त असते. विद्यापीठ तसेच शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजना यांचा लाभ घेता येतो. महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रत्येक स्तरावरील सक्रिय सहभाग, योगदान, ज्ञान, मार्गदर्शन व कार्य, प्रेरणा मोलाची ठरते. या सर्व बाबींचा परिपाक म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात तसेच काही विद्यार्थी स्वयं रोजगार निर्मितीचा पर्याय निवडतात.
कॉर्पोरेट, औद्योगिक, सेवा, प्रशासकीय, आयटी, बीटी, बॅंकिंग, वित्त, संगणक, जैव तंत्रज्ञान, व्यापार इत्यादी क्षेत्रास अपेक्षित असलेल्या स्कीलसह मनुष्यबळ उपलब्ध करून देता येते. साहजिकच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नामी संधी उपलब्ध होतात. या विद्यार्थ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्याची गरज भासत नाही. परिणामी कंपन्यांचा वेळ व पैसा वाचतो. असे विद्यार्थी कामावर रुजू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून आपले दैनंदिन कामकाज सुरू करू शकतात. अशी परिस्थिती महाविद्यालय व औद्योगिक कंपनी या दोन्हीच्या दृष्टीने परस्पर हिताची ठरते. शैक्षणिक स्वातंत्र्य दिल्याने संशोधनास चालना मिळेल, नवनिर्मितीचा ध्यास प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये रुजेल, याचा समाजास फार मोठा फायदा होईल.
नजीकच्या काळात अनेक महाविद्यालये स्वायत्ततेचा पर्याय निवडतील. पालक, विद्यार्थी व नोकरी देणाऱ्या संस्था, कंपन्या या प्राधान्याने स्वायत्त महाविद्यालयाकडे प्रवेशाच्या दृष्टीने व रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून आकर्षित होतील, यात शंका नाही.