हेमंत देसाई
देशभर दौरा करून पक्षात प्राण फुंकण्याचे काम केले जात नाही, नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात नाहीत. अशावेळी पक्षांतर्गत घातपात होणे स्वाभाविक आहे, हे राहुल गांधी यांच्या लक्षात येणार का?
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकांत चारपैकी तीन राज्यांत भाजपने उत्तम यश मिळवले आणि महाराष्ट्रात तर आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसनेचा गेम केला. राजस्थानात कॉंग्रेसने आपले तीनही उमेदवार निवडून आणले. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पक्षातील वजन वाढले असून, सचिन पायलट यांची चडफड वाढणार आहे. गेहलोत यांचे पिताजी हे प्रसिद्ध जादूगार होते आणि म्हणूनच गेहलोत यांचे निकटवर्तीय शशिकांत शर्मा यांनी गेहलोत यांचा विजय साजरा करण्यासाठी “जादू’ असा उल्लेख आपल्या ट्विपणीत केला. गेहलोत आणि पायलट यांच्या स्पर्धेत सुभाषचंद्र गोयल यांचा विजय होऊ नये, याची कॉंग्रेसने व्यवस्थित दक्षता घेतली.
कॉंग्रेसचे काही आमदार गोयल यांना मदत करतील, अशी भाजपला आशा होती. गोयल यांनी तर पायलट गटाला तसे जाहीर आवाहन केले होते. पैशाची जादू यशस्वी होईल, असे संबंधितांना वाटले असेल, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गेहलोत यांनी आपल्या सर्व आमदारांना रिसॉर्टवर ठेवले होते. यापूर्वीदेखील पायलट यांनी बंड केले होते, तेव्हा त्यांनी अशीच व्यवस्था केली होती. येत्या डिसेंबरमध्ये राजस्थानात विधानसभा निवडणुका असून, तोपर्यंत मुख्यमंत्रिपद स्वतःकडेच ठेवण्याचा गेहलोत यांचा प्रयत्न आहे.
हरियाणात भाजपप्रणीत मनोहरलाल खट्टर यांचे सरकार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत या सरकारला घरी पाठवावे, अशी कॉंग्रेसची कितीही इच्छा असली, तरी हे उद्दिष्ट पूर्ण होणे आज तरी कठीण दिसते. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते भूपिंदर हूडा यांनी मध्यंतरी पक्षात महत्त्वाची भूमिका निभावली होती. कॉंग्रेसमधील जी-23 गटाने बंडखोरीचा पवित्रा धारण केला, तेव्हा हूडा यांनी राहुल गांधी व जी-23 यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभा निवडणुकीत हरियाणात भाजप आणि जेजीपी युतीने कॉंग्रेसमधील पक्षांतर्गत वादाचा व्यवस्थित वापर करत विजय मिळवला.
यामुळेच कॉंग्रेसचे उमेदवार अजय माकन यांना आवश्यक तितकी मतसंख्या असूनही पराभवाचा सामना करावा लागला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत भाजपचे कार्तिकेय शर्मा विजयी झाले, कारण कॉंग्रेसचे असंतुष्ट आमदार कुलदीप बिश्नोई यांनी माकन यांना मतदान केले नाही, तर दुसरे आमदार किरण चौधरी यांनी चुकीचे मत टाकल्याचा आरोप आहे. हरियाणा विधानसभेत 90 सदस्य आहेत. त्यात भाजपचे 40, कॉंग्रेसचे 31 आणि जेजेपीचे 10 आमदार आहेत. त्यांच्याशिवाय 7 अपक्ष आमदार असून, इंडियन नॅशनल लोकदल आणि हरियाणा लोकहित पक्षाचा प्रत्येकी एकेक आमदार आहे.
हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली. भाजपला त्यांचे उमेदवार कृष्ण पनवार यांच्या विजयाबाबत खात्री होती. कॉंग्रेसलाही पुरेशी संख्या असल्यामुळे, माकन निवडून येतील असा विश्वास वाटत होता. परंतु माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे निलंबित नेते विनोद शर्मा यांचे चिरंजीव कार्तिकेय यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. 31 मे रोजी दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीने शर्मांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले, त्यामुळे कॉंग्रेस धास्तावली. मग हूडा यांनी आपल्या कॉंग्रेस आमदारांना रायपूरला नेले. मात्र कॉंग्रेसच्या 31 पैकी 28 आमदारच रायपूरला पोहोचले.
बिश्नोई आणि चौधरी हे दोन आमदारही अनुपस्थित होते. 3 जून रोजी भाजपने शर्मांना समर्थन जाहीर केले आणि लगोलग सात अपक्ष आमदारांपैकी सहाजणांनी आपण शर्मांना कौल देणार असल्याचे घोषित केले. हरियाणा लोकहित पक्षाचे गोपाल कांडा आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे अभय चौटाला यांनीही कार्तिकेय शर्मांचा जयघोष सुरू केला. त्यातच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड न झाल्याने बिश्नोई कॉंग्रेस पक्षावर नाराज होते. शर्मा हे हरियाणातील माध्यमसम्राट आहेत. तर बिश्नोई हे माजी मुख्यमंत्री आणि आयाराम गयाराम संस्कृतीचे उपासक भजनलाल यांचे चिरंजीव. बिश्नोई यांनी भूपिंदर हूडा आणि त्यांचे चिरंजीव दीपेंदर यांना धडा शिकवला.
माकन हे राहुल गांधींचे विश्वासू सहकारी असून, त्यामुळेच त्यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक आहे. हरियाणातील कॉंग्रेसची नुकतीच फेररचना झाली, त्यावेळी आपल्याकडे दुर्लक्ष झाले, अशी कुलदीप बिश्नोई यांची भावना झाली होती. राज्यसभा निवडणुकांपूर्वी राहुल गांधींची भेट व्हावी अशी त्यांची इच्छा होती, पण ठरलेली भेट ऐनवेळी रद्द झाली. राज्यसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, “मला साप कसे मारायचे आहेत हे माहीत आहे. त्यामुळे सापांच्या भीतीने मी जंगल सोडणार नाही’, असे ट्वीट बिश्नोई यांनी केले. कॉंग्रेसमध्ये अक्षरशः बेदिली माजली असून, पक्षश्रेष्ठींना याचे काहीही सोयरसुतक नाही.
राहुल गांधी यांनी तर महाराष्ट्रात कॉंग्रेस हा सरकारचा घटक असूनही, गेल्या अडीच वर्षांत एकदाही मुंबईत येऊन आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले नाही. ना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वास्तविक देशभर दौरा करून कॉंग्रेस पक्षात प्राण फुंकण्याचे काम त्यांनी करायला हवे. परंतु देशाचे सोडा, किमान नवी दिल्ली, पंजाब व हरियाणाकडे तरी त्यांनी लक्ष द्यायला हवे, तेही घडत नाही. पक्षाच्या केंद्रीय व प्रदेशातील नेत्यांना ते भेटतही नाहीत. अशावेळी पक्षांतर्गत घातपात होणे स्वाभाविक आहे. हरियाणात तेच घडले.