विशाखापट्टणम :- भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी येथे होत आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावलेल्या भारतीय संघाला अव्हान जीवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे.
पहिल्या सामन्यात बारतीय संघाने द्विशतकी धावा केल्यावरही दक्षिण आफ्रिकेने त्याचा यशस्वी पाठलागस करत सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दीडशतकी मजलही मारता आली नव्हती. हे आव्हानही पाहुण्या संघाने लिलया पार केले व मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता तिसरा सामनाही जिंकून मालिका खिशात टाकण्याची त्यांना नामी संधी आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ जास्त तुल्यबळ वाटत आहे. पहिल्या सामन्यात त्यांचे प्रमुख फलंदाज बाद जाल्यावरही डेव्हीड मिलरच्या वादळी फलंदाजीने त्यांनी सहज विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात कर्णधार थेम्बा बवुमाने थोडीफार चमक दाखवली मात्र, त्यांचा नवोदित हेनरीच क्लासेन याने अफलातून आक्रमक फलंदाजी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
या दोन्ही सामन्यात भुनवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता भारताच्या एकाही गोलंदाजाला पाहुण्यांवर दडपण राखता आले नाही. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघातील नवोदितांना चमक दाखवण्याची नामी संधी होती मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. या मालिकेसाठी लोकेश राहुलकडे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, सराव सत्रात दुखापत झाल्यामुळे त्यालाही या मालिकेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे नेतृत्व सोपवण्यात आले.
भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यांत चांगली सलामी मिळाली नाही तसेच मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता हा तिसरा सामना भारतासाठी करो या मरो या स्थितीत असून आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे.