मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदार पार पडले. राज्यसभा निवडणुकीतील चुरस पाहता यावेळी मतदान करणाऱ्या सदस्यांवर लक्ष ठेवले जाईल आणि एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या जातील हे अपेक्षित होते. त्यानुसार आजही तसेच घडले. महाविकास आघाडीचे दोन मंत्री जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानाच्या पद्धतीवर भाजपच्या निरीक्षकांनी आक्षेप घेऊन त्यांची मते बाद करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. मात्र त्यांची मागणी फेटाळण्यात आली.
निवडणुकीच्या पद्धतीनुसार पक्षाकडून जे निरीक्षक नेमण्यात आले होते त्यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी मतदान केल्यानंतर मतपत्रिका दाखवणे बंधनकारक आहे. तथापि यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हातात आपली मतपत्रिका दिली, तसेच जितेंद्र आव्हाड यांनीही आपली मतपत्रिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात दिली. त्यामुळे या दोघांचीही मते बाद करावीत अशी मागणी भाजपचे निरीक्षक पराग अळणी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.
दरम्यान अळणी यांचा हा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी अमान्य करून ही दोन्ही मते ग्राह्य धरण्याची सूचना केली. त्यामुळे महविकास आघाडीवरील मोठी नामुष्की टळली.