नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. सहभागी होण्यापूर्वी हार्दिकने ट्विटमध्ये लिहिले की, राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन. पदाच्या लालसेपोटी आजपर्यंत मी कुठेही कुठलीही मागणी केलेली नाही, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षावर नाराज नेत्यांचा भाजपमध्ये समावेश करणार –
हार्दिक पटेल म्हणाले की, लवकरच दर 10 दिवसांनी एक कार्यक्रम आयोजित केला जाईल ज्यामध्ये काँग्रेस पक्षावर नाराज असलेले आमदार, जिल्हा पंचायत किंवा तहसील पंचायत सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य यांना भाजपासोबत जोडले जाईल.
दरम्यान, हार्दिक पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. निवडणुकीपूर्वी त्यांचे हे पाऊल काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. काँग्रेस सोडण्यापूर्वी हार्दिक यांनी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणावर सडकून टीका केली होती.
काँग्रेसवर जोरदार निशाणा –
आपल्या राजीनाम्याच्या पत्रात हार्दिकने लिहिले होते की, काँग्रेस पक्ष केवळ विरोध करण्यापुरता मर्यादित राहिला आहे. देशातील जनतेला विरोध नाही तर त्यांच्या भविष्याचा विचार करणारा आणि देशाला पुढे नेण्याची क्षमता असलेला पर्याय हवा आहे. त्यांनी राजीनामा पत्रात पुढे लिहिले आहे की, अयोध्येतील राम मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे असो किंवा जीएसटी लागू करणे असो, देशाला दीर्घ काळापासून यावर तोडगा हवा होता. मात्र, काँग्रेसने यात केवळ अडथळा म्हणून काम केले. काँग्रेसची भूमिका केवळ केंद्राला विरोध करण्यापुरती मर्यादित होती.