पुणे :- सात-बारा उतारा, फेरफार आणि खाते उताऱ्यांपाठोपाठ आता वारसनोंद अर्ज घरबसल्या दाखल करता येणार आहे. ही सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली असून ई-हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. “महाभूमि’ या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचला असून जिल्ह्यात महिन्यात सरासरी सुमारे 100 पेक्षा अधिक अर्ज ऑनलाइन येत आहेत.
वारस नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे सर्व अर्ज ऑनलाइन होणार आहेत. त्यासाठी ई-हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
याचसह अनेक शेतकरी शेतीपीक अथवा उद्योग व्यवसायासाठी बॅंकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनींवर बोजा चढविणे अथवा कर्ज फेडल्यानंतर तो बोजा काढून घेण्यासाठी बॅंका व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो. तो आता कमी होणार आहे “इ- हक्क’ ही प्रणाली देखील बॅंकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे अथवा काढण्यासाठी बॅंकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे.
नागरिकांना होणार हे फायदे
– हस्तलिखित वारस नोंदवही आणि तक्रार नोंद वही बंद होणार.
– या कामासाठी तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करता येणार.
– फक्त जबाब देण्यासाठीच तलाठी कार्यालयात जावे लागणार.
– ऑनलाइनमुळे तलाठी स्तरीवल पेंडन्सी कळणार.
– आवश्यक कागदपत्रे जोडल्यास पंधरा दिवसात वारस नोंद, त्यापुढील पंधरा दिवसात फेरफार नोंद होणार.
पडताळणी ऑनलाइनच होणार
महसूल विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करुन दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार अशा प्रमुख सुविधांचा यामध्ये समावेश आहे. करोनाच्या काळात ऑनलाइन सुविधेचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. शासनाने वारसनोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदींसाठी ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मृत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांना “महाभूमि’ या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. हा ऑनलाइन अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील.