पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यातील दोन अधीक्षकांना चार वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झालेला आहे. हे अधीक्षक आता बदलीस पात्र असताना त्यांना आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा घाट घालण्यात आला आहे.
“टीईटी’च्या निकालात गडबडी करून नापास झालेल्या उमेदवारांना पास करण्यात आले. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. परीक्षा परिषदेतील या भ्रष्ट कारभारामुळे शालेय शिक्षण विभागाला कलंक लागला. परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी इतर कार्यालयात बदल्या करून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हालचाली सुरू ठेवल्या आहेत. परीक्षा परिषदेत एकाच कार्यालयात अनेक वर्षे काम करणारे काही अधीक्षक आहेत. यात शशिकांत चिमणे, संजय काळे या अधीक्षकांना चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. अधीक्षक उत्तम खरात, मूल्यमापन अधिकारी सोनाली मातेकर यांना तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. हे चारही अधिकारी आताच्या बदली हंगामात बदलीस पात्र ठरत आहेत. 4 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेल्या बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या यादीतही त्यांची नावे नमूद केली आहेत. या अधिकाऱ्यांनी बदलीसाठी पसंतीक्रमही दाखल केलेले आहेत.
दरम्यान, जून्या अधीक्षकांच्या बदल्या झाल्यास परीक्षा परिषदेचे कामकाज ठप्प पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे दोन अधीक्षकांना तरी आणखी एक वर्ष मुदतवाढ मिळावी अशी मागणी परीक्षा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही अधीक्षकांना आता परीक्षा परिषदेत काम करण्याची इच्छा राहिलेली नाही.