महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमध्ये प्रचंड मोठी जाहीर सभा घेऊन गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध घडामोडींचा आपल्या शेलक्या शब्दांमध्ये समाचार घेतला. करोना कालावधीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या घराच्या बाहेर पडलेले नाहीत, या एकाच विषयाचे भांडवल करून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी ठाकरे यांनी खास या सभेचे नियोजन केले होते.
अर्थात या सभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांना त्यांनी प्रामुख्याने लक्ष केले आणि या दोन पक्षांवर टीका करताना त्यांनी “असली आणि नकली’ या दोन शब्दांचा खूप मोठ्या प्रमाणात आधार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अडीच-तीन वर्षांपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याने त्यांनी हिंदुत्वाची कास सोडून दिली, अशा प्रकारची टीका गेले कित्येक महिने भाजपातर्फे करण्यात येत असल्याने या टीकेला उत्तर देण्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी सभेमध्ये असली हिंदुत्ववादी कोण आणि नकली हिंदुत्ववादी कोण, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेण्याचा धडाका लावला आहे. त्या सभांमध्ये त्यांनी शिवसेनेवर खरपूस टीका केली होती. त्याला उत्तर देतानाही उद्धव ठाकरे यांनी “शाल पांघरून हिंदुत्ववादी किंवा शिवसेनाप्रमुख होता येत नाही’ अशा प्रकारची टीका करून राज ठाकरे हे नकली हिंदुत्ववादी आहेत, हे भासवण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात घेतलेल्या सभेत त्यांनी आपला अयोध्या दौरा घोषित केला होता. त्यानंतर अयोध्येमध्ये जी पोस्टर लागली होती त्यात “असली नकली’ या थीमचा वापर करण्यात आला होता. राज ठाकरे हे नकली असून आदित्य ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत, ते असली आहेत हे भासवण्याचा प्रयत्न त्या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आला होता. हीच असली आणि नकली थीम वापरून उद्धव ठाकरे यांनी आपल्या शनिवारच्या भाषणामध्ये सर्व विरोधकांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली, या एकाच विषयावर भाजप सतत शिवसेनेवर टीका करत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या काही राज्यांमध्ये घटना घडल्या त्या प्रकारच्या घटनांबाबत शिवसेना जर भाजपसोबत असती, तर त्यांनी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली असती; पण आता ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत असल्याने अशा घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांच्यावर मर्यादा येत आहेत, ही जाणीव भाजपने गेल्या काही महिन्यांमध्ये करून दिली आहे. पण आम्ही आमचा हिंदुत्ववाद विसरला नसून आमच्या नसानसात, रक्तारक्तात हिंदुत्ववाद आहे हे सांगण्याचा प्रयत्न या व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांनी केला आणि तो प्रयत्न करताना त्यांनी भाजपच्या नेत्यांचे किंवा राज ठाकरे यांचे हिंदुत्व कसे बनावट आणि नकली आहे, हे अनेक उदाहरणे देऊन सांगितले.
विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही हिंदुत्ववाद सोडलेला नाही, अशा प्रकारची घोषणा केलेली होतीच. आगामी कालावधीमध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने या निवडणुकांमध्ये हिंदुत्व हा विषय गाजण्याची लक्षणे दिसत असल्याने उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक ही सभा घेऊन भाजप आणि राज ठाकरे यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज भासली. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मशिदीवरील भोंगे हा विषय असो किंवा अमरावती येथील राणा दांपत्याने हनुमान चालिसाच्या निमित्ताने उपस्थित केलेला विषय असो, या दोन्ही विषयांमध्ये वेळीच आपण उत्तरे दिले नाहीत तर ते अडचणीचे ठरू शकतात याची जाणीव असल्यानेच शिवसेनेतर्फे या मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषयांबरोबरच हिंदुत्व हा विषयही गाजणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी ही जाहीर सभा घेऊन भाजप, राज ठाकरे आणि आपल्यामधील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना हिंदुत्ववादी आहे आणि महाराष्ट्रातील लोकांनी बोगस आणि बनावट हिंदुत्ववाद्यांच्या मागे जाऊ नये, असा स्पष्ट संदेश देण्याचा उद्धव ठाकरे यांचा इरादा होता आणि तो काही प्रमाणात सफल झाला असेच म्हणावे लागेल.
म्हणूनच शिवसेनेने हिंदुत्वाची साथ सोडलेली नाही हे अधोरेखित करताना उद्धव ठाकरे यांना असली आणि नकली या तुलनेचा आधार घ्यावा लागला. आगामी कालावधीमध्ये या भाषणावर प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे जेव्हा आगामी सभा घेतील तेव्हा तेसुद्धा या असली आणि नकलीची तुलना विशेषतः मुन्नाभाई पद्धतीने झालेल्या टीकेला निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या विषयांना स्पर्श केलेला नाही त्या विषयांचे भांडवल करून उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्याचा प्रयत्न आगामी कालावधीत भाजप आणि राज ठाकरे यांच्याकडून केला जाईल, हे उघड आहे. एकीकडे केंद्रीय पातळीवर कॉंग्रेसने विचारमंथन करून चिंतन शिबिराच्या माध्यमातून आगामी राजकारणाची दिशा ठरवण्याचा विषय गंभीरपणे घेतला आहे तर, दुसरीकडे महाराष्ट्रामध्येही शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते ठिकठिकाणी दौरे करून पक्ष वाढवण्याचे काम करत असतानाच भाजप, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्ववादाच्या वादाच्या विषयात अडकले आहेत, हा फरकही लक्षात घेण्यासारखा आहे.
अर्थात उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. हा दौरा मुख्यमंत्री म्हणून असणार आहे का शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असणार आहे, याबाबत अद्याप जरी त्यांनी स्पष्टीकरण दिले नसले तरी प्रत्येक ठिकाणी पुन्हा एकदा या असली आणि नकली हिंदुत्ववादाचा विषय समोर येणारच आहे आणि त्यानंतर भाजप आणि मनसे यांच्या कडून उत्तर देण्याचे कामही केले जाणार आहे. साहजिकच महाराष्ट्रातील आगामी राजकारण संपूर्णपणे “असली आणि नकली’ या शब्दांभोवती फिरत राहणार आहे.